श्रीरामपूर – बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण आणि हत्याकांड खंडणीसाठीच झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या घटनेतील एका आरोपीला हिरण यांनी ओळखले होते. खंडणी मागितल्यानंतर त्यांना सोडून दिले तरी आपण पकडले जाऊ या भीतीने हिरन यांची हत्या झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, नगर येथील गुन्हे शाखेचे अनिल कटके, निरीक्षक संजय सानप यावेळी उपस्थित होते.
याप्रकरणी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून पाच आरोपींना अटक केली आहे. संदीप मुरलीधर हांडे (वय २६, माळेगाव, ता. सिन्नर), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय २५, रा. सप्तशृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर), अजय राजू चव्हाण (वय २६, पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय २९, रा. उक्कडगाव, ता. कोपरगाव) व एक २२ वर्षीय व्यक्ती अशा पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अपहरणासाठी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
आरोपींकडून हिरण यांचा मोबाईल फोन, तसेच अपहरणासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन (एमएच-१५, जीएल ४३८७) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. गुन्ह्यातील काही आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासात आणखी काही आरोपी निष्पन्न होतील. अपहरण झाले त्यावेळी हिरण यांच्याकडे १ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या मारुती व्हॅनमध्येच करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गालगत आणून टाकण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.
अपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हॅनमधून संशयास्पदरित्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी अनेक व्हॅनचा शोध घेतला. त्यावरून नाशिक येथील व्हॅन मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. त्यामुळे संशय बळावल्यानंतर काही तासांमध्ये सर्व आरोपींना पकडले. या गाडीत हिरण यांच्या मोबाईलसह बँकेचे चेकबूक व पावत्या सापडल्या. त्याचबरोबर आरोपींपैकी एकाने मोठी चूक केल्याने पोलिसांना फायदा मिळाला. मात्र त्याविषयी अधिक माहिती देण्यात आली नाही.