चहा म्हणजे माझा जीव की प्राण असे अनेकांच्या तोंडून ऐकण्यास मिळते. त्यामुळे चहा अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. दिवसाच्या सुरुवातीपासून ते बाहेर फिरेपर्यंत आणि संध्याकाळच्या गप्पांनंतर काहींना रात्री झोपण्याआधी देखील चहा दिला तर ते आवडीने पितात. त्यामुळे चहा हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. मात्र तुम्ही पित असलेला चहा खरचं चांगला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणारी एक टोळी गजाआड केली आहे. या टोळीकडून चहा पावडरमध्ये भेसळ करण्याचे प्रकार सुरु होते. त्यामुळे तुम्ही देखील चहा आवडीने पित असाल तर आता विचार करण्याची गरज आहे.
मुंबईतील शिवडी बंदर रस्त्यावर छापेमारी करत पोलिसांनी तब्बल 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. या प्रकरणी राजू अबुलअजहर शेख आणि राहुल शेख अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपींनी कुणाला आणि कुठे भेसळयुक्त चहाचा पुरवठा केला याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.
दरम्यान जप्त करण्यात आलेल्या या भेसळयुक्त चहा पावडरची किंमत तब्बल 85 हजार रुपये असल्याचे सांगितले जातेय. याप्रकरणी पोलिसांनीभेसळयुक्त चहा पावडर विकणाऱ्या गँगमध्ये आणखी किती लोकांचा समावेश आहे या तपास सुरु केला आहे.
राज्यात आधी देखील भेसळयुक्त पनीर, खवा, मावा, दुध, तेल अशा अनेक पदार्थ्यांमध्ये भेसळ केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पण आता चहा पावडरमध्येही भेसळ होत असल्याची माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त होतेय. दरम्यान मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याने या टोळीतील पाळेमुळे शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.