पुणे : स्वारगेट डेपोतून फलटणला निघालेल्या तरुणीवर मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याला शोधून देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा पोलिसांकडून करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता पुण्यातील सामाजिक संघटना आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. कारण घटनेपासून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असतानाही घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले असून गृहराज्य मंत्री योगेश कदम आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पण यावेळी त्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Pune Crime Minister Yogesh Kadam car coming to Swargate depo was stopped by Trupti Desai)
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस डेपोमध्ये येऊन घटनास्थळाचा आढावा घेतला. याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्री कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तृप्ती देसाईंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाते. 50 तासानंतर योगेश कदम येथे आले आहेत. योगेश कदमांना जाब विचारायचा होता, त्यांना भेटायचा होते, राज्यात काय चालले आहे, हे विचारायचे होते म्हणून आम्ही त्यांची गाडी अडवली. गाडे सारखा साधा आरोपी सापडत नाही, कसली यंत्रणा आहे. एक लाखाचे बक्षीस जाहीर करता, पोलिसांना लाखो रुपये पगार मिळतो, फुकट मिळतो, पोलीस निष्क्रीय आहेत. राजकीय संबंध कुणाचे आहेत माहिती नाही, राजकीय दबावाने अनेक प्रकरणे दाबली गेली आहेत, असा थेट आरोपच देसाई यांनी केला.
तसेच, आरोपी गाडे सरेंडर होण्याची वाट बघत आहात का? असा सवाल करत तृप्ती देसाई म्हणाल्या की, रात्रभर महिला झोपल्या नाहीत, आज सगळ्या महिला आहेत, मुली आहेत, सगळ्या घाबरत आहेत. एसटी महिला सुरक्षितपणे प्रवास करतात, 50 टक्के प्रवास मोफत मिळतो म्हणून, तिथे पण महिला सुरक्षित नाहीत, असेही तृप्ती देसाईंनी म्हटले आहे. तर, मंत्री योगेश कदमांना लोकांनी निवडून दिले आहे, लोकशाहीत जाब विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला जबरदस्ती सीपी, अॅडिशनल सीपी, कॉन्स्टेबल ओढून आणतात. पण यांनी आरोपीला ओढून आणले पाहिजे, तुमच्याकडून होऊ शकत नसेल तर, आम्हाला सांगा, आम्ही निकाल लावू. गृह राज्यमंत्री योगेश कदम इथे आले आहेत. ते कोणत्या तोंडाने आले? त्यांनी येताना आरोपीला आणले पाहिजे. पुणे पोलिसांचे पूर्ण अपयश आहे, कोयता गँग आहे गाड्या जाळत आहेत, पण पुणे पोलीस पूर्णपणे अपयशी आहेत. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घ्यावे, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असेही यावेळी तृप्ती देसाईंनी म्हटले आहे.