सोलापूर : राज्यात वाढती गुन्हेगारी कमी करणे हे सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. दररोज राज्यातील विविध भागामध्ये गुन्हे घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झालेले आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर पाऊले उचलणार असे बोलले जात असतानाच, आता सोलापुरात एका मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चारचाकी वाहनाचे हप्ते न भरल्याने वसुली कर्मचाऱ्यांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडली आहे. (Solapur Crime Debtor’s son kidnapped by recovery staff after defaulting on vehicle installments)
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यात एका मुलाचे अपहरण झाल्याची नोंद करण्यात आली. 01 फेब्रुवारीला याची नोंद करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, तक्रारदाराने त्याच्याकडील चारचाकी वाहनाचे हप्ते भरले नसल्याने खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केले. खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या चारचाकी वाहनाला तर जप्त केलेच. पण त्यासोबतच त्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण सुद्धा केले. या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्याला एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होते. याप्रकरणी, वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे, इमरान शेख, देवा जाधव या तिघांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण तर केलेच, पण त्यासोबतच मुलाला सोडण्यासाठी 100 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने आणि जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे. तर, बँक किंवा फायनान्स कंपनींचे एजंट सक्तीची किंवा गुंडगिरी पद्धतीने वसुली करत असतील तर कर्जदार किंवा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूरच्या नागरिकांना विजय कबाडे यांनी केले आहे.