अलिबागः विरोधकांवर सतत आरोप करणारे भाजप नेते वर्षाच्या पहिल्याच दिवशी अलिबागला गेले होते. त्यांचा हा दौरा राजकीय नव्हता किंवा मौजमजेसाठी नव्हता. रश्मी ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्याविरोधात तक्रार करण्यासाठी सोमय्या अलिबागला गेले होते. त्यांनी पुन्हा पोलिसांत याची तक्रार केली आहे.
पोलिसांत तक्रार केल्यानंतर सोमय्या यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. स्थानिक पोलीस तक्रारीची चौकशी करतील. चौकशी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई करुन गुन्हा नोंदवला जाईल, असे आश्वासन रेवदंडा पोलिसांनी मला दिले आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.
कोरले अलिबाग १९ बंगले घोटाळा. रेवदंडा पोलिस स्टेशन येथे ठाकरे आणि वायकर परिवार यांचा विरोधात, ग्रामपंचायतीची नोंद खोटी, फोर्जरी करणे बेकायदेशीर कृत्ये करणे. म्हणून IPC 415,420,467,468,471 अंतर्गत तक्रार दाखल
एका आठवड्यात कारवाई होणार @BJP4Maharashtra pic.twitter.com/9Ia877CgVi
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 1, 2023
अलिबागच्या कोर्लईतील १९ बंगले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे दाखवण्यात आले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. गेल्यावर्षी त्यांनी याची रेवदंडा पोलिसांत तक्रार केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी येथील सरकारी अधिकारी किरण पाटील यांच्यावर दबाव आणला व या बंगल्याच्या नोंदी नष्ट केल्या. रश्मी ठाकरे यांच्या नावाने भाडेपट्टी भरली जात होती. या नोंदीचा १३ वर्षांचा तपशील गायब करण्यात आला, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार गेले व शिंदे-फडणवीसचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर सर्वच चित्र बदलले. रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा पहिला अहवाल समोर आला. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतने ते १९ बंगले रश्मी ठाकरे यांचे असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे सोमय्या यांनी सांगितले. अनिल परब यांच्या रिसाॅर्टची जशी चौकशी करण्यात आली. तशीच रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असेही सोमय्या यांनी सांगितले.
ठाकरे सरकार गेल्यानंतर सोमय्या हे या प्रकरणावर मौन बाळगून होते. शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व नेते याविषयी गप्प होते. अचानक सोमय्या हे अलिबागमध्ये दाखल झाल्याने याप्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली.