नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबर 2023पर्यंतची मुदत दिली आहे. यावरून काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलून देण्याची तयारी भारतीय स्टेट बँकेने केली आहे. यावरून माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) आधी नोटाबंदी केली, पण काळ्या पैशाला आळा घालण्यात यश मिळाले नाही. आता हे 2000 रुपये बंद करण्याचा निर्णय म्हणजे नवे नाटक आहे, अशी टीका त्यांनी केली.
Banks have clarified that no identity, no forms and no proof will be required to exchange the Rs 2000 notes
The BJP’s spin that the Rs 2000 notes are being withdrawn to unearth black money stands demolished
Ordinary people do not have Rs 2000 notes. They shunned it soon after…
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 22, 2023
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत सूचनापत्र जारी केली आहे. 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही, असे एसबीआयने त्यात म्हटले आहे. त्यामुळे एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन सहजपणे नोटा बदलता येतील. यावरून चिदंबरम यांनी केंद्र सरकारला थेट सवाल केला आहे. ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार असतील तर, तुम्हाला ‘काळा पैसा’ शोधण्यात कशी मदत होईल, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा भाजपाचा डाव आता फसला असल्याची टीका त्यांनी केली.
सन 2016मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर लोकांनी लगेचच त्या घेणे बंद केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा नाहीत. दैनंदिन किरकोळ व्यवहारांसाठी या नोटा योग्य नव्हत्या, त्यामुळे लोक या नोटांपासून दूरच राहिले. मग या 2000 रुपयांच्या नोटा कोणी ठेवल्या आणि वापरल्या? हे आता स्पष्ट आहे. तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे, असे चिदंबरम म्हणाले.
दोन हजार रुपयांची नोट बदलण्याची व्यवस्था करून सरकारने आता काळा पैसा पांढरा करणे सोपे केले आहे. ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची व्यवस्था करून सरकारने काळा पैसाधारकांसाठी रेड कार्पेट अंथरले आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.