स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीमधून तब्बल 11 कोटी रूपयांची नाणी गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सीबीआयने देशातील 25 ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने आज दिल्ली, जयपूर, दौसा, करौली, सवाई माधोपूर, अल्वर, उदयपूर आणि भिलवाडा येथील सुमारे 15 तत्कालीन बँक अधिकारी आणि इतरांच्या आवारात छापे टाकले आहेत. एसबीआयच्या मेहंदीपूर बालाजीमध्ये 11 कोटी रुपयांच्या नाण्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
सीबीआयने 13 एप्रिल 2022 रोजी राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून गुन्हा दाखल केला होता. तसेच पोलीस स्टेशन तोडाभीम, करौली येथे यापूर्वी नोंदवलेल्या गुन्ह्याची तपासणी करण्यात आली. तसेच झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तपासली जात आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उपरोक्त शाखेने ऑगस्ट 2021 मध्ये प्राथमिक चौकशीनंतर पैसे मोजण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा ही बाब निदर्शनास आली होती. नाण्यांची मोजणी खासगी कंपनीला आऊटसोर्स करण्यात आली. मोजणीनंतर असे आढळून आले की, शाखेतून 11 कोटींहून अधिक किमतीची नाणी गहाळ झाली आहेत. यानंतर, एसीबी जयपूरने ऑगस्ट 2021 मध्ये 11 कोटी रुपयांच्या नाण्यांच्या कथित फसवणुकीप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. मोजणी दरम्यान, सुमारे 3,000 नाण्यांच्या पिशवीमध्ये 2 कोटी रुपये मिळाले होते. जे आरबीआयच्या नाणेधारक शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले.
दरम्यान, एप्रिल महिन्यात सुद्धा अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. मेहंदीपूर बालाजी येथील एसबीआय शाखेच्या तिजोरीत तब्बल 13 कोटी किमतींची एक, दोन आणि पाच रूपयांची नाणी होती. परंतु, त्यातील काही नाणी गहाळ झाल्याचा संशय आल्यानंतर बँकेकडून जयपूरमधील एका खासगी कंत्राटदाराला ही 13 कोटी नाणी मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या कंत्राटदाराने नाण्यांच्या मोजणीला सुरूवात केल्यानंतर तब्बल 11 कोटी किमतीची नाणी गहाळ झाल्याचे समोर आले होते.
हेही वाचा : न्यायालयीन सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, कलकत्ता हायकोर्टाची पत्रकारांना परवानगी