केंद्र व राज्य सरकारने मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढू नये यासाठी,आखाती देश, युके या देशांतून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच आता ब्राझीलमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना ते जरी निगेटिव्ह असले तरी त्यांना सात दिवस हॉटेल्समध्ये तर सात दिवस घरी असे १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक पालिकेने जारी केले आहे. मुंबईत सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत आहे. राज्यातही कोरोनाबाबतची बेफिकिरी वाढल्याने रुग्ण संख्येत काहीशी वाढ होत आहे.
राज्यसरकार व मुंबई महापालिकेने युके, आखाती देशामधून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईत क्वारंटाईन होणे यापूर्वीच बंधनकारक केले होते. आता ब्राझील देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढू नये, यासाठी ब्राझील देशातून आलेला प्रवासी कोरोना निगेटिव्ह असेल तरी त्यास ७ दिवस हॉटेलमध्ये व नंतर ७ दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक केले असून तसे परिपत्रक पालिकेने जारी केले आहे.
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोविडची बाधा असल्यास त्यांना सेव्हन हिल्स, जी. टी. रुग्णालय यासह आणखीन पाच खासगी रुग्णालयात उपचार करुन घेण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. इंग्लडसह युरोप, पूर्व मध्य आशिया,दक्षिण अफ्रिकेसह ब्राझील मधून येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी करुन भारतात येणे बंधनकारक आहे. भारतात त्यांना सात दिवस हाॅटेलमध्ये आणि त्यानंतर आणखीन सात दिवस घरी असे १४ दिवस क्वारंटाईन राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा – Corona Vaccination: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना लसीचा घेतला पहिला डोस