दहशतवादाविरोधात लष्करानं आता कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. त्याचा सकारात्मक निकाल देखील हाती येताना दिसत आहे. कारण, भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचं कंबरडं मोडत त्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. मंगळवारी भारतीय लष्करानं दोन दहशतवाद्यांचा काश्मीर खोऱ्यातील केरन सेक्टरमध्ये खात्मा केला. त्यानंतर खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचा आकडा २०० झाला आहे. २०१८ वर्ष संपायला अद्याप दीड महिना शिल्लक आहे. त्यामध्ये दहशतवाद्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर – ए- तैयब्बा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश – ए- मोहम्मद या दहशवादी संघटनांच्या अतिरेक्यांचा समावेश आहे. जैश – ए – मोहम्मदला लष्करानं केलेल्या कारवाईचा फटका सर्वाधिक बसला आहे. या कारवाईत ठार झालेले ५० टक्के दहशतवादी हे जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. तर, हिजबुलच्या दहशतवाद्यांची संख्या ही ४० टक्क्यांपेक्षा देखील जास्त आहे. तर, लष्कर – ए- तैयबाच्या ३३ टक्के दहशतवाद्यांना लष्करानं यमसदनीस धाडले आहे.
भारतीय लष्करापुढे सीमेपलिकडील दहशतवाद्यांसोबत स्थानिक दहशतवाद्यांचे देखील आव्हान आहे. पण, या दुहेरी आव्हानाला देखील लष्करानं जशास तसे उत्तर दिले. २०१७मध्ये देखील लष्करानं ऑपरेशन ऑल आऊट राबवलं होतं. रमजानच्या महिन्यामध्ये लष्करानं दहशतवाद्यांविरोधातील कारवाई थांबवली होती. पण, त्यानंतर देखील दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे सरकारवर देखील टीका झाली होती. मात्र रमजान संपताच लष्करानं पुन्हा एकदा धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा खात्मा करायला सुरूवात केली.
एकंदरीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी पाहता लष्करानं दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईला मोठं यश आलं असंच म्हणावं लागेल.