गेल्या काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये फेरबदलाची चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या आता निवडीला वर्ष झाले आहे. दरम्यान, काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये फेरबदल करण्याची मागणी केली आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणी
पक्षामध्ये अमूलाग्र बदल करण्याविषयी काँग्रेसच्या पाच मुख्यमंत्र्यांसह २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी आणि लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
१५ दिवसांपूर्वी देण्यात आले पत्र
काँग्रेस पक्षामध्ये बदल करण्याची मागणी करणारे हे पत्र १५ दिवसांपूर्वी देण्यात आले आहे. या पत्रामध्ये काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला असून पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी आणि लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
काय आहे पत्रात?
पक्षामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा करण्याबरोबरच, सत्तेचं विकेंद्रीकरण, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, प्रत्येक स्तरावर पक्षातंर्गत निवडणूका, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ घटना तयार करण्याची’ मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा – अरे, आता म्हणे दाऊद पाकिस्तानमध्ये नाहीच!