दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरामध्ये तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे मोठा गहजब उडाला आहे. मोठ्या संख्येने या
कार्यक्रमात आलेले लोक कोरोनाग्रस्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याबाबत देण्यात आलेली आकडेवारी गंभीर अशी आहे. देशभरात आत्तापर्यंत एकूण २ हजार ९०२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असून त्यातल्या ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याशिवाय १८३ जण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे देशभरातल्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी ३० टक्के म्हणजे तब्बल १०२३ जण हे तबलिगी जमातशी संबधित असल्याची माहिती आज केंद्रीय सचिवांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Till now we have found cases related to Tableeghi Jamaat from 17 states, 1023 #COVID19 positive cases have been found to be linked to this event. Out of the total cases in the country, around 30% are linked to one particular place: Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry pic.twitter.com/4Jtzpc4u5k
— ANI (@ANI) April 4, 2020
कोणत्याही सुरक्षेविना दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने या जमातीचे लोक सहभागी झाले होते. यामध्ये अनेक देशांमधून आलेले लोक देखील होते. त्यामधून कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. या कार्यक्रमानंतर हे सर्व लोक देशभरात गेले. त्यामुळे त्यांच्यासोबत कोरोनाचा फैलाव देखील देशाच्या त्या त्या भागामध्ये झाल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर या तबलिगींच्या संपर्कात आलेल्या तब्बल २२ हजार लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली आहे.
महाराष्ट्रात देखील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काहीजण आले आहेत. मात्र, या सगळ्यांना शोधण्यात आरोग्य यंत्रणेला आणि प्रशासनाला यश आलं असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच, याव्यतिरिक्तही जर कुठल्या परिसरामध्ये अशी लक्षणं दिसणारं कुणी आढळलं, तर आरोग्य विभागाला माहिती देण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.