जम्मू – काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला गालबोट लागले आहे. यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे दरड कोसळून ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. २७ जूनला अमरनाथ यात्रेची सुरूवात झाली आहे. यावर्षी यात्रेमध्ये तब्बल २ लाख भाविक सहभागी झाले आहेत. अमरनाथला जाण्यासाठी यात्रेकरूंचा एक गट बलाटल मार्गे रवाना झाला. पण बलाटलला जाणाऱ्या मार्गावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे लष्कराने भाविकांना २८ जुनलाच बलाटल बेस कॅम्पवर थांबवले. त्यानंतर पाऊस कमी झाला. परिणामी भाविकांनी पुढे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. पण, याचवेळी काळाचा घाला झाला आणि दरड कोसळून ५ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, बचाव पथक जागेवर पोहोचले असून जखमी भाविकांवर उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांचा संभाव्य दहशतवादी हल्ल्या होण्याच्या शक्यतेने अमरनाथ यात्रेच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Indo-Tibetan Border Police personnel carried out rescue of pilgrims near Bararimarg on Baltal route of #AmarnathYatra last night, following a landslide on the route. pic.twitter.com/967OmVl4YC
— ANI (@ANI) July 4, 2018
गेल्यावर्षी झाला होता दहशतवादी हल्ला
गेल्या वर्षी अर्थात जुलै २०१७ साली अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या यात्रेमध्ये ७ यात्रेकरू ठार तर १५ जण जखमी झाले होते. ठार झालेल्या भाविकांमध्ये पालघरमधील २ भाविकांचा समावेश होता. पण, या भ्याड हल्ल्यानंतर देखील भाविकांच्या मनोधौर्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता. गुजरातच्या वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची ती बस होती. पण ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले होते. अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी लष्कराने पूर्ण खबरदारी घेतली असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.