आजच्या आधुनिक काळातही अनेक उदार माणसं समाजाचं आपण काही ‘देणं’ लागतो या भावनेने अफाट संपत्ती दान करत असतात. किंवा वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत असतात. असेच एक तामिळनाडू जिल्ह्यातील कोयंम्बतूर येथील ६३ वर्षाचे एम बालाचंदर हे व्यावसायिक असून ते थुथूकुडीतील २५० आदिवासी बांधवांना दररोज मोफत दुपारचे जेवण देतात. आदिवासी भागातील गरीब व गरजू कुटुंबांचा तपशील घेवून त्यांच्या घरोघरी जावून मोफत अन्नदान केले जाते. दररोज २५० लोकांचे अन्न तयार करण्यासाठी ते सहा हजार रूपये खर्च करतात.
संपत्तीचा केला त्याग
जिल्ह्यातील पनाप्पल्ली, कोंदनूर, जामबुकंडी, कुत्तूपूल्ली तसेच जिल्ह्यातील अनैकत्ती हिल्स येथील थक्कलूर या ठिकाणच्या आदिवासी भागांना भेट देऊन तेथील आदिवासी बांधवाना मोफत अन्नदान करत आहेत. पूर्वी बालाचंदर यांचा दागिन्यांचा व्यवसाय होता. संत पत्तीनाथर यांच्या प्रेरणेतून प्रभावीत होऊन गरिबांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. पत्तीनाथर यांनी आपल्या संपत्तीचा त्याग करून चौदाव्या वर्षी ते संत बनले. त्यावेळी ते आदिवासी बांधवांना जेवण देत होते, असे बालाचंदर सांगतात. बालाचंदर हे दररोज सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आपला मित्र मुरूगन यांच्यासोबत आदिवासी भागात जावून २५० अन्न पॅकेटांचे मोफत वाटप करत आहेत. त्याचबरोबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी पलमलाई येथे जाऊन २५० आदिवासी कुटुंबांना ५ किलो तांदूळ आणि १ किलो तेलाचे वाटप करतात.
असे आहे बालाचंदर यांचे कुटुंब
बालाचंदर यांना पत्नी, मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांचा मुलगा कोयम्बतूर येथील प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टर या पदावर कार्यरत आहे. तर दोन्ही मुली ही परदेशात स्थायिक आहेत.