देशात कोरोना दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) थैमान घातले. पण आता कोरोनाची दुसरी लाट मंदावली असून गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. पण या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ७१९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत. बिहारमध्ये १११ डॉक्टर्स दगावले आहेत. यामध्ये दुसऱ्या नंबरवर दिल्ली असून १०९ जणांचा मृत्यू दिल्लीत झाला आहे.
Indian Medical Association (IMA) says 719 doctors died during second wave of COVID-19 pandemic; maximum 111 doctors lost their lives in Bihar, followed by Delhi (109) pic.twitter.com/4CCFSIMZj6
— ANI (@ANI) June 12, 2021
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांच्या प्रकरणात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या नंबरवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये ७९ डॉक्टर्स, पश्चिम बंगालमध्ये ६३ डॉक्टर्स आणि राजस्थानमध्ये ४३ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात २३ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
‘या’ राज्यांमध्ये सर्वात कमी डॉक्टरांचा मृत्यू
पुद्दुचेरी, गोवा, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे सर्वात कमी डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीमध्ये एकाच डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर गोवा, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये दोन-दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला.
देशात गेल्या २४ तासांत ८४ हजार ३३२ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख २१ हजार ३११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९३ लाख ५९ हजार १५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ६७ हजार ८१ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ७९ लाख ११ हजार ३८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या १० लाख ८० हजार ६९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात २४ कोटी ९६ लाख ३०४ जणांचे लसीकरण पार पडले आहे.
हेही वाचा – केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार