नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी तुरुंगातून देशाला उद्देशून पत्र लिहिले आहे. त्याद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सुशिक्षित असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. कमी शिकलेले पंतप्रधान देशासाठी अत्यंत धोकादायक असते. पंतप्रधान मोदींना विज्ञान समजत नाही, त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी 60,000 शाळा बंद केल्या. भारताच्या प्रगतीसाठी सुशिक्षित पंतप्रधान असणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
Jailed former Delhi deputy CM Manish Sisodia writes to PM Modi, raises questions on his education.
“For the progress of India, it is necessary to have an educated PM,” Sisodia writes in his letter to the PM. pic.twitter.com/yV7peRjns3
— ANI (@ANI) April 7, 2023
आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज नवनवीन प्रगती होत आहे. संपूर्ण जगात आर्टिफिशिअल इंटेलिजेंसची (AI) चर्चा सुरू आहे. अशा वेळी नाल्यात पाइप टाकून घाणेरड्या गॅसपासून चहा किंवा अन्न बनवता येते, असे पंतप्रधानांचे म्हणणे ऐकून मला धडकीच भरते. नाल्यातील घाणेरड्या गॅसपासून चहा किंवा अन्न बनवता येते का? नाही. ढगांच्या मागे उडणारे विमान रडारवर दिसत नाही, असे पंतप्रधान जेव्हा सांगतात, तेव्हा ते जगभरात हास्यास्पद ठरतात. शाळा-कॉलेजात शिकणारी मुले त्याची चेष्टा करतात, असे मनीष सिसोदिया यांनी या पत्रात म्हटले आहे. मद्यधोरण घोटाळ्याच्या आरोपावरून मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींची अशी विधाने देशासाठी अत्यंत धोकादायक आहेत. भारताचे पंतप्रधान किती कमी शिकलेले आहेत आणि त्यांना विज्ञानाचे प्राथमिक ज्ञानही नाही, हे जगाला समजते. हे नुकसानप्रद आहे. इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा पंतप्रधानांची गळाभेट घेतता, तेव्हा प्रत्येक मिठीची मोठी किंमत ते वसूल करून निघून जातात. त्या बदल्यात किती कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या जातात ते माहीत नाही; कारण पंतप्रधान कमी शिकलेले असल्यामुळे ते समजत नाही, असा टोलाही त्यांनी या पत्रातून लगावला आहे.