नवी दिल्ली : दिल्लीच्या सुलतानपुरी परिसरात (Delhi Sultanpuri Accident) नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एका तरुणीला कारने जवळपास 13 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना घडली. या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. स्कूटीवर ही तरुणी एकटी नव्हती, तर अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत आणखी एक मुलगी होती, असे पोलिसांना या प्रकरणचाा तपास करताना आढळले. केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेची दखल घेतली असून दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
थर्टी फर्स्टच्या रात्री नशेत असलेल्या बलेनो कारच्या चालकाने एका तरुणीच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही तरुणी कामावरून घरी जात असल्याचे म्हटले जाते. स्कूटीला धडक दिल्यानंतर कारचालकाने या तरुणीला जवळ 13 किलोमीटर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या व्हिडीओनुसार तरुणीच्या दोन्ही पाय, डोके आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्ण (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल (27) या पाच जणांना अटक केली आहे.
#WATCH | Kanjhawala death case: CCTV footage of that night shows the presence of another girl with the girl who died after being dragged for a few kilometres by a car that hit her in Sultanpuri area.
(CCTV visuals confirmed by police) pic.twitter.com/nd1NUBQVze
— ANI (@ANI) January 3, 2023
पाचही आरोपींनी कांजवाला रस्त्यावरील जोंटी गावाजवळ कार थांबवून पाहिले असता, त्यांना तरुणी गाडीत अडकलेली दिसली. आरोपींनी मुलीला गाडीखाली काढून तसेच टाकून दिले. त्यावेळी मुलीच्या अंगावर एकही कपडा नव्हता. सुलतानपुरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार (क्रमांक-2/23) आरोपी अमित आणि दीपक यांनी कारमालक आशुतोषला सांगितले की, ते दारूच्या नशेत होते. किशन विहारमध्ये त्यांनी स्कूटीवरून जाणाऱ्या तरुणीला धडक दिली होती आणि भीतीपोटी ते घटनास्थळावरून पळून गेले होते.
स्कूटीला कारने धडक दिली त्यावेळी स्कूटीवर त्या तरुणीसोबत आणखी एक मुलगी होती. या अपघातात तिला किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर ती घरी गेली होती. मात्र मृत तरुणीचा पाय कारच्या एक्सलमध्ये अडकल्याने ती कारबरोबर फरफटत गेली. पोलिसांनी मृत तरुणीच्या मित्राचा जबाब नोंदवला असून आता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिच्याबरोबरच्या मुलीचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
जनतेच्या रोषामुळे पोलिसांनी जोडली नवीन कलमे
पोलिसांची मोठ्या प्रमाणात गस्त असताना आणि पोलिसांनी गांभीर्याने दखल न घेतल्याने सोमवारी दिल्लीतील नागरिकांनी रोष व्यक्त केला. सुलतानपुरी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली. लोकांचा रोष आणि लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांच्या नाराजीनंतर सुलतानपुरी पोलिसांनी सोमवारी एफआयआरमध्ये 304 (सदोष मनुष्यवध) आणि 120 (गुन्हेगारी स्वरुपाचा कट) ही कलम जोडली.