मुंबईः अदानी समूह आता वॉटर प्यूरिफाय, ट्रिटमेंट व डिस्ट्रिब्यूशन सेक्टरमध्ये उतरणार आहे. या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याचे टाटा समूहदेखील नियोजन करत आहे. त्यामुळे टाटा व अदानी यांची स्पर्धा या क्षेत्रात बघायला मिळेल.
टाटा समूह बिसलेरी विकत घेत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. बिसलरी कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी याचे संकेत दिले होते. आपली कंपनी टाटा समूहाला सोपवणार असल्याचे चौहान यांनी सांगितले होते.
अदानी समूहाचे मुख्य वित्त अधिकारी जुगशिन्दर सिंह यांनी सांगितले की, अदानी समूह हा पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रचलित आहे. या क्षेत्रात आम्ही भरीव कामगिरी केली आहे. आता अदानी समूह जलशुद्धीकरण, संशोधन व वितरण क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी नियोजन सुरु आहे.
२७ जानेवारीला अदानी समूहाचा एफपीओ येत आहे. ३१ जानेवारीपर्यंत त्याची मुदत आहे. सुमारे २० हजार कोटी रुपयांचा हा एफपीओ आहे. याची किमत ३,११२ ते ३२७६ रुपये आहे. गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे.
गेल्या वर्षी अदानी समुहाच्या भांडवलात मोठी वाढ झाली. अदानी समूहात २०० अब्ज डॉलर्सची वाढ झाली. त्यामुळे मार्केट कॅपिटलायझेशन होणारा अदानी समूह भारतातील तिसरा उद्योग समूह बनला. या ग्रुपच्या सात लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे शेअर्स ऑल टाईम हाय असल्याने अदानी समुहाने ही किमया केल्याचे स्पष्ट केले. तसेच धारावी पुनर्विकासाची धुरा अदानी समुहाची हाती आली आहे. अदानी समूहाने सर्वाधिक म्हणजेच ५,०६९ कोटी रुपयांची बोली लावली होती. तर डीएलएफ कंपनीने २०२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. सर्वाधिक बोली लावल्याने अदानी समूहाला पुनर्विकासाचे अधिकार मिळाले आहेत.
गेल्याच आठवड्यात अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांंची भेट घेतली. शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यात ही भेट झाली. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.