आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर दोन्ही देशांच्या सीमांवर सध्या तणावाच वातावरण आहे. त्यातच काश्मीरच्या खोऱ्यात १० हजार सुरक्षा दलाचे सैनिक तैनात करण्यात आल्याने देशभर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
बैठकीतून परिस्थितीचा आढावा
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील सद्यस्थिती काय आहे. यासाठी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार आणि उमेदवारांविरोधात दहशतवादी कारवाया होण्याूची शक्यता असल्याने केंद्रीय दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याचेही मलिक यांनी यावेळी सांगितले. यामध्ये पुढील काही दिवसात आणखी भर पडणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तशा सूचना आल्या असून त्यानुसार सीआरपीएफ-४५, बीएसएफ-३५, एसएसबी-१० आणि आयटीबीपीच्या-१० कंपन्या मंजूर करण्यात याव्यात, अशी फॅक्सद्वारे सूचना पाठवण्यात आली आहे.
J&K Governor Satya Pal Malik called an informal meeting of State Administrative Council to review current situation particularly in the context of #PulwamaTerrorAttack&subsequent developments. He was informed of gradual induction of additional Central Forces for election purposes pic.twitter.com/KEYl1K3Lnm
— ANI (@ANI) February 24, 2019
कलम ३५ अ वर निर्णय…?
दरम्यान, येत्या २६ ते २८ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या घटनेतील कलम ३५ अ च्या कायद्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून त्यात काही घटनात्मक बदल केले जाऊ शकतात. कलम ३५ अ नुसार जम्मू-काश्मीरमधील जमीन बाहेरील व्यक्ती खरेदी करु शकणार नाही. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जवानांच्या आणि डॉक्टरांच्या सुट्टयाही रद्द करण्यात आल्या आहेत.