देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या तेजीने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. प्रशासन आणि राज्य सरकार ज्या वेगाने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करत आहेत तेवढ्याच वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशाची परिस्थिती आता ब्रिटेनसारखी होताना दिसत आहे. कोणतातरी नवीन वेरिएंटमुळे कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याची शक्यता असल्याचे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. कोरोनाची लागण तरुणांना अधिक होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे तरुणांनी आपली जबाबदारी समजली पाहिजे असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.
तरुणांना जबाबदारी समजली पाहिजे – गुलेरिया
कोरोनाची लागण युवकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तरुणांना जर आपली जबाबदारी समजली नाही तर ज्येष्ठ नागरिकांनाही याचा मोठा फटका बसेल. असे झाल्यास थोड्या कालावधीनंतर सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होईल असे ही रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणे अपेक्षित
देशात लॉकडाऊन लावून कोरोनावर मात करता येणार नाही. लॉकडाऊन करण्यापेक्षा लहान-लहान प्रतिबंधीत क्षेत्र तयार करणे योग्य राहील. तसेच कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ करुन रुग्णांवर योग्य आणि तात्काळ उपचार मिळाल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल. तसेच कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र तयार करून कोरोनावर मात करणे शक्य असल्याचेही एम्स संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
केंद्राचे जनतेला आवाहन
केंद्र सरकारने वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली आहे. देशात कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. देश संकटात आहे. यामुळे लोकांनी सावधानी बाळगली पाहिजे तसेच कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले आहे.