सगळ्या जगात कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये सापडला होता. त्यानंतर कोरोनानं आख्ख्या जगाला झपाटल्याप्रमाणे आपल्या विळख्यात घेतलं. आजघडीला अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून त्याखालोखाल भारत आणि ब्राझील यांचा क्रमांक लागतो. या पार्श्वभूमीवर सगळं जग पुन्हा एकदा परिस्थिती सामान्य कधी होईल, याची वाट बघत असताना भारतात देखील त्याच आशेवर सगळे बसले आहेत. Corona Vaccine आल्यानंतर सारंकाही सुरळीत होईल आणि परिस्थिती पुन्हा Normal होईल, अशी आशा भारतीयांना वाटत आहे. पण कोरोनाची लस येवो वा न येवो, पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत परिस्थिती सामान्य होईल, असा दावा दिल्लीतल्या AIIMS अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये करण्यात आला आहे. एम्सच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी हा दावा केला आहे. AIIMS मधून हा दावा आल्यामुळे त्याला नक्कीच महत्त्व असल्याचं सांगितलं जात आहे.
By mid-next year, there's a possibility of normalcy even if vaccine comes or not. Till the time there is no effective vaccine available, #COVID19 preventive measures like wearing masks, hand hygiene etc. should be followed: Dr Sanjay Rai, Head-Community Medicine Department, AIIMS https://t.co/UzxHd9sjAT
— ANI (@ANI) September 18, 2020
एएनआयने केलेल्या ट्वीटमध्ये डॉ. संजय राय यांचं म्हणणं मांडण्यात आलं आहे. ‘ICMR ने या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात देशाच्या विविध भागांमध्ये सेरो सर्वेक्षण केलं. त्यामध्ये १८ वर्षांवरील जवळपास ६ कोटी ४० लाख भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचं निरीक्षण दिसून आलं. पण सेरो सर्वेक्षणामुळे फक्त कोरोना संसर्गाची दिशा कळू शकते. पण चाचण्यांमधून निश्चित कोरोना बाधितांची आकडेवारी कळू शकते. कोरोनाची लस येवो वा न येवो, पण पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत (मे-जून-जुलै) परिस्थिती सुरळीत होण्याची दाट शक्यता आहे. पण जोपर्यंत कोरोनाची एखादी प्रभावी लस येत नाही, तोपर्यंत मास्क, सॅनिटायझर यांचा वापर व्हायलाच हवा’, असं डॉ. संजय राय म्हणाले आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि भारतातील सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून संशोधन सुरू असलेल्या लसीची सध्या चाचणी सुरू असून या लसीकडून तमाम भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच, रशियाने तयार केलेली कोरोनाची लस देखील भारतीयांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी लस पूर्णपणे सुरक्षित आहे का याची चाचणी भारतीय संस्थांमार्फत होणं अनिवार्य असेल.