भारतात अजूनही कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवला आहे. मात्र, तरीदेखील तोपर्यंत कोरोना नियंत्रणात येईल असं खात्रीने सांगता येणं कठीण आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील सरकारी हवाई वाहतूक कंपनी असेलल्या एअर इंडियाने येत्या ४ मेपासून विमान प्रवासाच्या तिकिटांचं बुकिंग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर यासंदर्भात संदेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याचा उल्लेख या संदेशात करण्यात आला आहे.
एअर इंडियाने ४ मेपासून काही निवडक देशांतर्गत अर्थात डोमेस्टिक विमानांच्या तिकिटांचं बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. त्यासोबतच १ जूनपासून अशाच प्रकारे काही निवडक आंतरराष्ट्रीय विमानांचं तिकीट बुकिंग देखील सुरू करण्याची घोषणा कंपनीच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे.
Air India opens bookings for select domestic flights May 4th 2020 onwards and International Flights June 1st, 2020 onwards pic.twitter.com/Lsz9gRLF9V
— ANI (@ANI) April 18, 2020
काय म्हटलंय संदेशामध्ये?
वेबसाईटवर, ‘जगभरात फैलावलेल्या या साथीच्या रोगामुळे आम्ही आंतरदेशीय विमानाचे बुकिंग ३ मे पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे बुकिंग ३१ मे २०२०पर्यंत बंद ठेवले आहेत. पण त्यानंतर निवडक आंतरदेशीय विमानांचे बुकिंग ४ मेपासून आणि निवडक आंतरराष्ट्रीय विमानांचे तिकीट बुकिंग १ जून २०२०पासून सुरू असणार आहेत. कोरोनासंदर्भातल्या परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेऊन आहोत. यासंदर्भात वेळोवेळी तुम्हाला माहिती देतच राहू’, असं या संदेशात नमूद केलं आहे.