संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्या बुधवार ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर २९ डिसेंबरला हे अधिवेशन संपणार आहे. परंतु संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये ३० हून अधिक नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
सर्वपक्षीय बैठकीला दिग्गज नेत्यांची उपस्थिती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेतील नेते आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, याशिवाय लोकसभेतील काँग्रेस आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन आदी, दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचे पडसाद या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दिवशी उमटू शकतात. येत्या ८ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी एका दिवसात निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, चीनच्या सीमेवरील तणाव, दरवाढ, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फेरआढावा आदी. मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.
या बैठकीत ३१ पक्षांचा सहभाग
या बैठकीची माहिती देताना सरकारच्या वतीने प्रल्हाद जोशी म्हणाले की, बैठकीत बोलावलेल्या ४७ पक्षांपैकी ३१ पक्षांनी सहभाग घेतला. सर्व पक्षांनी आपापले मुद्दे आणि विषय समोर ठेवले आहेत. आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अधिवेशनापूर्वी पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीऐवजी यावेळी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात सरकारने हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या १६ विधेयकांची यादी जाहीर केली होती.
हेही वाचा : जी-२० मध्ये एल-२० : भारतातील कामगार वर्गासाठी