येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये महाविद्यालये, सरकारी, खासगी कार्यालयांनी सार्वजिनक सुट्टी असते. मात्र केंद्र सरकारने आता या जयंतीनिमित्त देशभरात सार्वजिनक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत केंद्रीय कामगार, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. यामुळे यंदापासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच शाळा, महाविद्यालये, सरकारी, खासगी कार्यालयांना सुट्टी असणार आहे.
या निवेदनामध्ये केंद्राने स्पष्ट केले की, भारतामधील औद्योगिक कार्यालयांसह सर्व सरकारी कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act 1881 च्या सेक्शन २५ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी साजरी केली आहे.
स्वतंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते. १४ एप्रिल १८९१ या साली मध्यप्रदेशातील महू या गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धीमान न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, वकील, पत्रकार तसेच हरिजन बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जीवन व्यथित केले.
बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची आर्थिक घडी बसण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महिला शिक्षण आणि अधिकार, दलितांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आजही आठवणीत आहेत. आंबेडकरांनी स्वत:चे सारे आयुष्य दलित पीडित, शोषितांसाठी व्यथित केले. समाजातील तळगळातील व्यक्तींचाच नेहमी ते विचार करत राहिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे त्यांचे ब्रीद वाक्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण, समाज कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. याचदरम्यान ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे दिल्लीत निधन झाले.