नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमां खान यांच्याशी चर्चा केली. बांगलादेशातील अल्पसंख्य तसेच मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा यावेळी अमित शाह यांनी उपस्थित केला. शिवाय सीमाव्यवस्थापन आणि सर्वसाधारण सुरक्षेच्या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमां खान यांची भेट घेतली. सीमा व्यवस्थापन आणि सामान्य सुरक्षा या मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली, असे ट्वीट गृह मंत्रालयाने केले आहे. तथापि, शाह यांनी खान यांच्यासोबत बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केलाचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
Union Home Minister @AmitShah met H.E. Asaduzzaman Khan, the Home Minister of Bangladesh on the sidelines of the ‘No Money for Terror’ conference. Both sides had productive exchanges on border management and common security-related issues. pic.twitter.com/5ix6DJfNMC
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) November 18, 2022
गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या तिसऱ्या मंत्रिस्तरीय ‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेत सहभागी होण्यासाठी असदुझ्झमां खान राजधानी दिल्लीत आले आहेत. ही दोन दिवसीय परिषद आहे. शुक्रवारी या परिषदेत 75हून अधिक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे 450 प्रतिनिधी सहभागी झाले होते.
‘दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा आणि दहशतवादाचा जागतिक कल’ या विषयावरील ‘नो मनी फॉर टेरर’ मंत्रिस्तरीय परिषदेच्या पहिल्या सत्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अध्यक्षपद भूषवले. दहशतवाद हा निःसंशयपणे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका आहे, परंतु, दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा हा दहशतवादापेक्षाही अधिक धोकादायक आहे, दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्यामुळे जगातील देशांची अर्थव्यवस्था कमकुवत होते, असे अमित शाह म्हणाले.
भारत, सरहद्दीपलीकडून पुरस्कृत दहशतवादाचा अनेक दशकांपासून बळी ठरला आहे, सांगून ते म्हणाले, काही देश दहशतवाद्यांना संरक्षण आणि आश्रय देतात हे आपण पाहिले आहे. एखाद्या दहशतवाद्याला संरक्षण देणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. अशा प्रवृत्ती कधीही त्यांच्या हेतूमधे यशस्वी होऊ नयेत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
आम्ही स्वस्थ बसणार नाही – मोदी
दहशतवादाला एखाद्या देशाकडून मिळणारे खतपाणी म्हणजे राजकीय तसेच आर्थिक मदतीचा मुख्य स्रोत आहे. काही देश स्वत:च्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून दहशतवाद्यांना मदत करतात. अशा देशांकडून त्याचा भुर्दंड वसूल केला पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
‘नो मनी फॉर टेरर’ (एनएमएफटी) या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जगाच्या आधी भारताने दहशतवादाचा क्रूर चेहरा पाहिला आहे. गेली अनेक दशके दहशतवादाने विविध नावाने, स्वरुपात भारताचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. हजारो मौल्यवान जीव यात हकनाक गेले, मात्र भारताने तडफेने दहशतवादविरोधी लढा लढला आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.