यवतमाळमध्ये अवनी वाघीणाला गोळ्या घालून ठार केल्याचं प्रकरण ताजं असताना आणखी एक धक्कादायक असं प्रकरण समोर आलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये संतापलेल्या गावकऱ्यांनी वाघिणीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार केलं आहे. लखीमपूर दुधवामधील व्याघ्र अभयारण्याचा भाग असणाऱ्या किशूनपूरच्या जंगलामध्ये ही घटना घडली आहे. सुरूवातीला या वाघिणीवर काठ्यांनी हल्ला करण्यात आला. त्यानंतर वाघीण बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर ट्रॅक्टर घालून तिला ठार करण्यात आलं. पीलभीत जिल्ह्यातील चलतुआ गावामध्ये राहणाऱ्या देवानंद सायकलवरून जात होते. त्यावेळी त्यांच्यावर वाघिणीनं हल्ला केल्याचं गावकरी सांगतात. दरम्यान, देवानंद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी हल्ला करत वाघिणीचा जीव घेतला. वाघिणीच्या हल्ल्यानंतर देवानंद यांच्या पत्नीनं आरडाओरड केला. त्यानंतर गावकऱ्यांनी देवानंद यांची वाघिणीच्या तावडीतून सुटका केली. मात्र देवानंद हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान, वाघिणीच्या मृत्यूनंतर वनधिकाऱ्यांनी गावात धाव घेत वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेतला. तर, वाघिणीचा जीव घेणाऱ्या गावकऱ्यांविरोधात वन्यजीव अधिनियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती वनधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, वाघिणीच्या वावराबद्दल आम्ही वनधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. पण, वनधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
Another #Tiger #NationalPride mercilessly killed by villagers with a tractor seized from @UpforestUp officials in #Chaltua #Mailani #KishanpurTigerSanctuary #UttarPradesh she injured a man when he ventured into the jungle. We need a special team for ever rising #ManAnimalConflict pic.twitter.com/FwN93fm2Ax
— Randeep Hooda (@RandeepHooda) 4 November 2018
नुकतंच अवनी या वाघिणीचं प्रकरण ताजं असताना आणखी एका वाघिणीच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं आहे. अवनी अर्थात टी- १ वाघिणीच्या मृत्यू प्रकरणावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाब विचारला आहे. शिवाय, प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांनी देखील अवनीला ठार करताना कोणतीही गोष्ट नियमरबाह्य झाली नाही असं म्हटलं आहे.