अरूणाचल प्रदेशातील अप्पर सियांग भागातून गेल्या काही दिवसात अपहरण झालेला १७ वर्षीय युवक अखेर चीनमध्ये सापडला आहे. मिराम तोरन या युवकाला सुरक्षितपणे भारतात पाठवण्यासाठीची चीनने हमी दिली आहे. भारतीय सेनेकडून करण्यात आलेल्या हॉटलाईन संवादामध्ये मिरामला सुरक्षित पाठवण्यासाठीच्या विनंतीवर चीनच्या पीएलने प्रोटोकॉलनुसार त्याला पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार भारतात पाठवण्यासाठी मिराम तोरनला आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे. हॉट लाईवर झालेल्या संवादात कुठे आणि कधी भारताकडे सुपुर्द करण्यात येणार याबाबतच्या माहितीसाठी भारतीय सैन्य प्रतिक्षेत आहे. याआधी गुरूवारी अरूणाचल प्रदेशचे लोकसभेचे खासदार तापिर गाओ यांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तरूणाचे अपहरण केल्याचा दावा केला होता. खासदारांनी या तरूणाचे नावही जाहीर केले होते. चीनच्या सेनेने सियुंगला येथील लुंगता क्षेत्रातून या तरूणाचे अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
यंत्रणांनी मिरामच्या सुटकेसाठीची मागणी करत खासदारांनी या घडलेल्या प्रकाराची प्रशासनाला माहिती दिली होती. या घटनेतील एक मुलाला त्या ठिकाणाहून पळून निघण्यात यश आले होते. या घटनेबाबत मिरामचा मित्र जॉनी यइयिंगने माहिती दिली होती. या घटनेतील दोन्ही तरूण हे जिडो गावचे रहिवासी आहे. अरूणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्या शियांग नदीच्या जवळ हे अपहरण करण्यात आले होते. या घटनेबाबत सर्व यंत्रणांना खासदारांनी माहिती दिली होती. तसेच गृहराज्यमंत्री निशीथ प्रमाणिक यांनाही या घटनेबाबतची कल्पना देण्यात आली होती.