दिल्लीसह अनेक ठिकाणी हरिजन वस्ती (Harijan Vasti) किंवा कॉलनी अस्तित्वात आहेत. अनेक वस्त्या हरिजन वस्त्या म्हणून ओळखल्या जातात. ही ओळख पुसली जावी याकरता दिल्ली सरकारने (Delhi Government) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, यापुढे वस्त्या आणि कॉलनींना असलेले हरिजन नाव बदलले जाणार असून या वस्त्या डॉ.आंबेडकर या नावाने ओळखल्या जाणार आहेत, त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
हरिजन शब्द बदलून डॉ.आंबेडकर असं नाव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी घेतला असून समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल (Rajendra Pal) यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
हरिजन शब्दाला बंदी घालणारे दिल्ली हे पहिले राज्य ठरले आहे, असं राजेंद्र पाल गौतम यांनी म्हटलं आहे. हरिजन हा शब्द घृणास्पद आणि अपमानजनक असल्याचं अनेक लोकांचं म्हणणं होतं, त्यामुळे या शब्दावर बंदी आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यासाठी दिल्ली सचिवालयात कायदा विभाग आणि नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हरिजन शब्दाऐवजी डॉ.आंबेडकर शब्द वापरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मान्य झाल्याने यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.