नवी दिल्ली : देशाच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी लाल किल्ल्यावरून भाषण करताना आपल्या सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडला. भाजपाचे बहुमाताचे सरकार सत्तेवर येताच देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म पाहायला मिळत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
देशाच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज, मंगळवारी लालकिल्ल्यावर आपला राष्ट्रध्वज फडकवला. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममधील स्वातंत्र्यदिनाचे शेवटचे संबोधन केले. आतापर्यंत पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या संबोधनातून विविध घोषणा केल्या असून, आता ते आपल्या दहाव्या संबोधनात कोणती महत्वाची घोषणा करतात याकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते.
हेही वाचा – Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील सर्व प्रतिष्ठित ठिकाणे तिरंग्याने सजली
लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी 2014पासून राज्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांची जंत्रीच सादर केली. 2014च्या आधी तीन दशके देशात अस्थिरतेचा आणि राजकीय तडजोडीचा कालखंड होता. त्यामुळे 2014मध्ये आणि 2019मध्ये जनतेने बहुमताचे सरकार आणले. बहुमताचे सरकार फॉर्म करायची संधी दिल्याने नरेंद्र मोदी यांना रीफॉर्म करण्याची हिम्मत आली. त्यानुसार परफॉर्म करण्याची जबाबदारी देशातील कानाकोपऱ्यातील सरकारी यंत्रणांनी पार पाडली. त्यात जनता जोडली गेल्याने ते ट्रान्सफॉर्म होताना दिसत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडला.
कोरोनानंतर भारताचे समार्थ्य जगाला समजले
दुसऱ्या महायुद्धानंतर ‘वर्ल्ड ऑर्डर’ बदलली होती. तसाच बदल कोरोना महामारीनंतर पाहायला मिळत आहे. या बदलत्या विश्वाला शेप देताना भारताचे सामर्थ्य समोर आले आहे. दुनियाने आमती शक्ती ओळखली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कोरोनानंतर जगाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव होता. पण भारतीय अर्थव्यवस्था डगमगली नाही. आपण मानवीसंवेदनांना प्राधान्य दिले. हाच मंत्र आपण जगाला दिला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यलढ्यात सर्वांचेच योगदान
भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन केले. तसेच स्वातंत्र्यलढ्यात सर्वांचेच योगदान होते, असे सांगताना, त्या पिढीत स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले नसेल अशी व्यक्ती विरळीच असेल, असेही मोदी म्हणाले.