प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना भाजपकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केला असून पुन्हा त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ओवैसी म्हणाले की, भाजप नुपूर शर्माला वाचवत आहे, अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन तातडीने कारवाई करावी. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. अशा परिस्थतीत त्यांनी मुस्लिमांचा भावना समजून घेऊन आदर्श ठेवला पाहिजे.
नुपूर शर्मा यांचे निलंबन ही शिक्षा नाही, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. दुसरीकडे भाजपची दक्षिण भारतात लवकरचं बैठक होणार आहे. ज्यामध्ये नुपूर शर्मांचे नाव पाहुण्यांच्या यादीत आहे. अशा स्थितीत पोलिसांना त्यांचे काम करु दिले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे या प्रकरणात अद्याप न्याय मिळत नाही, असा आरोपही ओवैसींनी केला आहे.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये शिंपी कन्हैया लालच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी नुपूर शर्माला आज सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका मिळाला, त्यानंतर नुपूर शर्मांचे प्रकरण पुन्हा एकदा देशभरात तापले आहे. यात ओवैसीसह अनेक नेते आता नुपूर शर्मांच्या अटकेची मागणी करत आहेत.