उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांचा जामीन रद्द करण्यात आला असून एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयानं या हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आशिष मिश्राचा घाईघाईत जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी घ्यावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
Supreme Court cancels bail granted to Ashish Mishra in the Lakhimpur Kheri violence case, directs him to surrender within a week pic.twitter.com/kIQJZ7UzHA
— ANI (@ANI) April 18, 2022
यापूर्वी ४ एप्रिलला सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. यानंतर निर्णय राखीव ठेवण्यात आला. १० फेब्रुवारीला अलाहाबाद हायकोर्टाच्या खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन दिला होता. मात्र, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर जामीन मंजूर करण्यास नकार देण्यात आला. यापूर्वी ते चार महिने कोठडीत होते. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
३ ऑक्टोबर लखीमपूरमध्ये झाला होता हिंसाचार
लखीमपूरच्या टिकुनिया येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या हिंसाचारात ८ लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याने आपल्या जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली. लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेवरून विरोधकांकडून केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधण्यात आला. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात आली होती.
शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआयटीने ५००० पानी आरोपपत्र दाखल केले आहेत. ही घटना सुनियोजित कट असल्याचे एसआयटीने म्हटले आहे.
हेही वाचा : Lakhimpur Kheri Case: केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला जामीन मंजूर