पूर्वोत्तर राज्य असलेल्या आसाम आणि मिझोराम यांच्यात २६ जुलैला सीमावादावरून झालेल्या हिंसक संघर्षात आसामचे ६ पोलीस शहीद झाले. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मराठमोळे आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांचाही समावेश आहे. तर एकाच देशातील दोन राज्यात सीमावादावरून रक्तरंजित संघर्ष झाल्याच्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या संघर्षात दोन्ही पोलीस दल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण या दोन राज्यांच्या हिंसक वादाचे नेमके कारण काय हे बघूया.
आसाम हे शांतताप्रिय राज्य आहे. पण असे असले तरी त्याला लागून असलेल्या मिझोरामसह इतर सहा राज्यांशी आसामचे तणावपूर्ण संबंध आहेत. या राज्याबरोबर त्यांचे सीमावादावरून वरचेवर खटके उडत असतात.
आसाम आणि मिझोराम ही दोन्ही राज्ये सतत एकमेकांवर जमीन बळकावल्याचा आरोप करतात. गेली १०० वर्ष हा वाद सुरू असून ब्रिटीशांनी केलेल्या दोन नियमांमुळे हा वाद आजतागयत सुरू आहे. १८३० पर्यंत कछर राज्य (आसाममधील जिल्हा) स्वतंत्र होतं. पण १८३२ साली राजाचा मृत्यू झाल्यानंतर हे राज्य ब्रिटीशांनी स्वत:च्या ताब्यात घेतलं. त्यानंतर ब्रिटीशांनी त्या भागात चहाच्या बागा लावल्या. यामुळे ब्रिटीशांनी आपल्या शेत जमीनीवर ताबा मिळवला असून आपल्याला त्यांचे गुलाम व्हावे लागणार अशी भीती तेथील स्थानिक नागरिकांना वाटू लागली. यामुळे असुरक्षिततेच्या याच भावनेतून त्यांनी या बागांमध्ये लूट करण्यास सुरुवात केली.
यामुळे ब्रिटीशांनी आसाममधील डोंगराळ भाग व आदिवासी वस्त्या असलेला भाग वेगळा केला. त्यासाठी कछार राज्य व मिझो हिल्स म्हणजेच (मिझोराम )यांच्या मधोमध सीमारेषा आखून दिली. पण जमिनीच्या या सीमारेषेप्रकरणी त्यांनी कुठलीच कल्पना मिझोवासीयांना दिली नाही. यामुळे मिझो वासीयांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. जो आजही कायम आहे.
ईशान्येकडील ८ राज्यांमध्ये आसाम हे दुसरे राज्य आहे. आसाममधील करीमगंज, कछर, हैलकांडी हे जिल्हे मिझोरामच्या आयजोल, कोलासिब आणि ममित या जिल्ह्यांना लागून आहेत. १९५० साली आसाम भारतामधील एक राज्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी नागालँड, अरूणाचल, मेघालय आणि मिझोराम या प्रदेशांचाही आसाममध्ये समावेश होता. पण १९७१ साली आसामची विभागणी करण्यात आली. त्यात मणिपूर, मेघालय, त्रिपुरा यांना राज्याचा दर्जा देण्यात आला.
तर १८८७ सालच्या मिझो करारनुसार मिझोरामला वेगळं राज्य म्हणून घोषित करण्यात आले. मात्र मिझो आदिवासींना ही सीमा आजही मान्य नाही. हेच या दोन्ही राज्यातील संघर्षाचे मूळ कारण आहे.