उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज (शुक्रवार) शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी ६ वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तसंच पंजाबमध्ये देखील शुकशुकाट पहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जोरदार प्रयत्न करत आहेत. अनेक बडे नेते देखील आज आपापल्या पक्षांचा प्रचार करणार आहेत. सत्ताधारी भाजपा, सपा, काँग्रेस, आरएलडी, बसपा आणि आप या व्यतिरिक्त अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र मुख्य लढत भाजप आणि सपा यांच्यात असल्याचे समजलं जात आहे.
१६ जिल्ह्यांतील ५९ जागांवर होणार मतदान
तिसऱ्या टप्प्यात यूपीच्या १६ जिल्ह्यांतील ५९ जागांवर मतदान होणार आहे. रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जवळपास २.१६ कोटी मतदार ६२७ उमदेवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
या जिल्ह्यांत असणार मतदान
तिसऱ्या टप्प्यामध्ये हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फर्रुखाबाद, कन्नोज, इटावा, औरैया, कानपूर देहात, कानपूर नगर, जालौन, झाशी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा येथे मतदान होणार आहे.
अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य ठरणार
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांनी करहाळमधून अखिलेश यादव यांना आव्हान दिले आहे. योगी सरकारचे मंत्री सतीश महाना, राम नरेश, राम नरेश अग्निहोत्री, नीलिमा कटियार, शिवपाल सिंह यादव आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांची नावे पणाला लागली आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ जागांवर २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.