आसाम आणि मिझोराम सीमारेषेवरून दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये मोठा हिंसाचार उफाळून आल्याची घटना समोर आली आहे. या हिंसाचाराला रोखण्यासाठी कर्तव्य बजावताना आसामाचे ६ पोलीस जवान शहीद झाले आहेत. तर ५० हून अधिक पोलीस जवान जखमी झाले आहे. या जखमी जवानांवर सिलचरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
आसाम आणि मिझोराममधील नागरिकांमध्ये सीमारेषेवरून बऱ्याच वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. यात आज आसाम आणि मिझोरामच्या सीमा भागांत राहणाऱ्या ८ शेतकऱ्यांच्या झोपड्यांना आग लागल्याच्या कारणावरून हिंसाचार आणखी उफाळून आला. काही अज्ञात समाजकंटकांकडून ही आग लावण्यात आली. या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मात्र या आगीच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून धुसफुसत असलेली सीमारेषेवरील वाद आणखी वाढला.
Hon’ble @himantabiswa ji, as discussed I kindly urge that Assam Police @assampolice be instructed to withdraw from Vairengte for the safety of civilians. @narendramodi @AmitShah @PMOIndia @HMOIndia https://t.co/wHtMPhFRpP
— Zoramthanga (@ZoramthangaCM) July 26, 2021
यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शिलॉगमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन दिवस होत नाही तोवर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. यावेळी दोन्ही राज्यातील नागरिक आपापसात भिडले. यावेळी दोन्हीकडून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र जमावाला आवर घालताना अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले असून ६ पोलीस जवान धारातिर्थी पडले आहेत.
या हिंसाचाराच्या घटनेची जबाबदारी दोन्ही राज्यांच्या मुख्य़मंत्र्यांनी एकमेकांवर ढकलत हात वर केलेतं. मात्र दोन्ही राज्यांमधील नागरिक आणि पोलीस हे सीमेवर आमनेसामने आल्याने संघर्ष अधिक वाढला. तर दोन्ही राज्यातील काही ठिकाणी छोट्या मोठ्या हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत आसाम आणि मिझोराम सीमा प्रश्नाचा वाद दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सामोपचाराने तोडगा काढण्याची विनंती नागरिक करत आहेत.