पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेला पायदळी तुडवले जात असल्याच्या घटना घडत आहेत. बंगालमधला हिंसाचार दिवसेंदिवस उफाळताना दिसत आहे. गुरुवारी परराष्ट्र व संसदीय कामकाज मंत्री वी मुरलधीरन यांच्या ताफ्यावर पश्चिम मिदनापुरात लाठी व दगडांनी हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री बंगालमध्ये ताफ्यासह गेले होते परंतु यावेळी मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप वी मुरलीधरन यांनी केला आहे. गाडीवर हल्ला करतानाचा व्हिडिओ मुरलीधरन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत हल्ल्याची माहिती दिली आहे.
वी मुरलीधरन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, टीएमसीच्या कार्यकर्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीच्या खिडक्या तोडल्या तसेच कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला आहे. मुरलीधरन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत असे दिसते आहे की, काही नागरिक टोळीने हातात काठ्यांनी हमला करत आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर दगडफेक करत आहे. कार्यकर्त्यांनी जोरात हल्ला केल्यावर मंत्र्यांची गाडी तेथून माघार घेते. परंतु मागूनही मंत्र्यांच्या गाडीला घेरण्यात आले होते. या हल्ल्यात एक माणूस मंत्र्यांच्या गाडीची काच काठीने तोडतो दुर्दैवाने यामध्ये एक चालक जखमी झाला आहे.
TMC goons attacked my convoy in West Midnapore, broken windows, attacked personal staff. Cutting short my trip. #BengalBurning @BJP4Bengal @BJP4India @narendramodi @JPNadda @AmitShah @DilipGhoshBJP @RahulSinhaBJP pic.twitter.com/b0HKhhx0L1
— V Muraleedharan (@VMBJP) May 6, 2021
केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांनी सांगितले की, जेव्हा पश्चिम मिदनापूरमध्ये पोहोचलो तेव्हा तेथील कार्यकर्त्यांच्या टोळीने गाडीच्या ताफ्यावर काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. ज्या गाडीमध्ये केंद्रीय मंत्री बसले होते त्या गाडीची काच तोडण्यात आली. पोलिसांच्या गाडींची तोडफोड करण्यात आली यादरम्यान एक चालक जखमी झाला आहे. हा हल्ला टीएमसी कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री वी मुरलीधरन यांनी केला आहे.
जे पी नड्डा यांनी दिली प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नड्डा यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. एका केंद्रीय मंत्र्यांवर हल्ला केला जात आहे. सामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल समजू शकतो. अशा आशयाचे ट्विट नड्डा यांनी केले आहे.
राज्यपालांकडून मागवला कायदा सुव्यवस्थेचा अहवाल
केंद्रीय गृहमंत्रालयाने बंगालमध्ये होणाऱ्या हल्ल्यसंबंधीत कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा अहवाल राज्यपाल जगदीप धनकड यांच्याकडून मागवला आहे. तसेच उच्चस्तरीय ४ सदस्यांची टीमही गठीत केली आहे. या टीममध्ये सीआरपीएफ जवान आणि अतिरिक्त सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक भागात हिसंचार उफाळला आहे. यामध्ये भाजपची कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपच्या ९ कार्यकर्त्यांचा हिंसाचारात मृत्यू झाला आहे.