बांग्लादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचाराचा घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एका अफवेमुळे दुर्गा पूजेदरम्यान हिंसाचार सुरू झाल्यानंतर आता याठिकाणी हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यादरम्यान अनेक निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे रविवारी रंगपूरच्या पीरगंजमध्ये अनेक हिंदूंची घरं जाळण्यात आली. तर अनेक हिंदूंच्या वस्त्यांना आग लावण्यात आली, अमेरिकेनेही बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्त्यांनी, धार्मिक स्वातंत्र्य आणि विश्वास हे मानवी हक्क आहेत. जगातील प्रत्येक व्यक्तीला त्यांची धार्मिक ओळख आणि श्रद्धा विचारात न घेता, सुरक्षित वाटले पाहिजे आणि त्यांचे सण साजरे केले पाहिजेत. अशा शब्दात बांगलादेशातील हिंदू समुदायावरील हल्ल्याचा निषेध केला.
कमिला येथील एका हिंदू प्रार्थनास्थळावर कुरानचा अपमान केल्याबद्दल अफवा पसरवण्यात आल्या, ज्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला, असे पोलिसांनी सांगितले. अफवा पसरल्यानंतर झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एका हिंदू तरुणालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीरगंजमध्ये हिंदूंची किमान २९ घरे जाळण्यात आली. गृहमंत्री असदुज्जंमान खान कमल यांनी सांगितले की, हिंदूंची घरे जाळणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटली असून आत्तापर्यंत ४५ हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे.
तसेच सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांच्या प्रत्येक पोस्टवर नजर असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, बांग्लादेशी हिंदू समुदायाचे सदस्य प्रणेश हलदर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला बांग्लादेशातील हिंदूंना आणखी त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी अमेरिकेतील मॉनिटरिंग ग्रुप आणि प्रसारमाध्यमांना बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार उघड करण्याचे आवाहनही केले आहे.
अमेरिकास्थित हिंदू ग्रुप हिंदू पीएसीटीचे कार्यकारी संचालक उत्सव चक्रवर्ती म्हणाले, “नोआखलीमध्ये ज्या प्रकारे हिंदूंवर हल्ले होत आहेत ते पाहणे भयंकर हेते. त्यांनी सांगितले की, ७५ वर्षांपूर्वी नोआखलीमध्ये १२ हजारांहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली आणि ५० हजारांहून अधिक लोकांना धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले.
ते म्हणाले की, बांगलादेशमध्ये हिंदूंना द्वेष आणि भेदभावासाठी लक्ष्य केले जात आहे. १९४० मध्ये बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या २८ टक्के होती, जी आता ९ टक्क्यांवर आली आहे. हिंदुपॅक्टने (HinduPACT)म्हटले आहे की, हिंसाचाराचे या घटना सिद्ध करतात की, तेथे हिंदूंचे आयुष्य अजूनही धोक्यात आहेत.