उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने एक भावूक करणारे आणि आपल्या व्यथा मांडणारे पत्र लिहिले होते. तसेच त्याने आपण आत्महत्या का करत आहोत हेदेखील पत्रातून सांगितले होते. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हे पत्र शेअर करत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरूर वाचावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
“उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता यांनी ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली ही अतिशय दु:खद घटना आहे. त्यांच काम बंद झाले होते. तसेच त्यांना आपल्या आईचे उपचारदेखील करायचे होते. सरकारकडून केवळ रेशन मिळाले होते. परंतु आणखीही काही गोष्टी आवश्यक असतात त्या खरेदी कराव्या लागतात आणि काही गरजाही असतात असे पत्रात त्यांनी म्हटले आहे.” असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. “हे पत्र कदाचित वर्षपूर्तीच्या पत्राप्रमाणे गाजावाजा करत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. परंतु एकदा हे पत्र तुम्ही वाचाच. भारतात आजही अनेक जण अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले आहे.
एक दुखद घटना में यूपी के भानु गुप्ता ने ट्रेन के सामने आकर आत्महत्या कर ली। काम बंद हो चुका था। इस शख्स को अपना और माता जी का इलाज कराना था। सरकार से केवल राशन मिला था लेकिन इनका पत्र कहता है और भी चीजें तो खरीदनी पड़ती हैं। और भी जरूरतें होती हैं..1/2https://t.co/A3Y6tBdexr
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 30, 2020
पत्रात काय म्हटलंय?
“मी गरीबी आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या करत आहे. सरकारच्या मदतीतून गहू आणि तांदूळ मिळत आहे, परंतु साखर, दुध, डाळ, मसाले यांची विक्री करणारे आता आम्हाला उधारीवर काहीही देत नाहीत. तसेच लॉकडाऊन वाढत चालला आहे. पण कुठे नोकरीही मिळत नाही,” असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. २९ मे रोजी त्यांच्या मृतदेहाजवळ हे पत्र सापडले होते. भानू गुप्ता हे लखीमपुर जिल्ह्यानजीक असलेल्या शाहजहांपूरमधील एका हॉटेलमध्ये काम करत होते. लॉकडाऊनमुळे हे हॉटेल बंद झाले आणि त्यांचा रोजगार गेला, असे स्थानिक माध्यमाद्वारे सांगण्यात आले.