मुंबई : नव्या संसद भवनाची सुरुवात महिला विधेयकाने झाली हे खरे, पण याच नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यातून ‘महिला’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वगळले होते. मुर्मू या आदिवासी महिला आहेत, हे पहिले कारण. त्या महिला असल्याने काहींचा अहंकार दुखावला गेला. त्यामुळे संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बाद करणाऱ्या सरकारने महिलांचे हक्क, सन्मान यावर प्रवचने करावीत, हे आश्चर्यच आहे, अशी कडाडून टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – …म्हणून महिला आरक्षण विधेयकास सगळ्यांचेच समर्थन, ठाकरे गटाचा भाजपासह काँग्रेसवर निशाणा
नव्या संसद भवनाचा श्रीगणेशा महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीने झाला आहे. लोकसभेत 454 मतांनी हे विधेयक मंजूर झाले. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात आहे. महिलांना राजकीय हक्क देणारे हे विधेयक गेल्या 13 वर्षांपासून वनवासात होते, असे सामना दैनिकातील अग्रलेखात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.
सध्या लोकसभेत 78 खासदार महिला आहेत, महिला आरक्षण विधेयकामुळे त्या 181 होतील. नव्या महिलांना राजकीय प्रतिष्ठा मिळेल. त्यापैकी बऱ्याच महिला राजकीय घराणेशाहीतूनच संसदेत जातील. मग महागाई, कौटुंबिक हिंसा, शोषण, बलात्कार, खून, त्यातून बळी पडलेल्या असंख्य ‘निर्भयां’चा न्याय कोण करणार? महिला आरक्षण विधेयक आणखी शंभर महिलांना खासदारकीचा मुकुट चढविण्यासाठी आहे. त्याचे स्वागतच आहे, पण महिलांना आरक्षणाइतकाच न्याय आणि सुरक्षा हवी आहे. घरातील चुली पेटत्या ठेवण्यासाठी किमान स्वस्ताई हवी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.
हेही वाचा – …असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अंबादास दानवेंचा थेट इशारा
उदयनिधी स्टॅलिन यांचाही हाच रोख
सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेले द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा भाजपावर हल्लाबोल केला आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारताच्या प्रथम नागरिक असूनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आले नाही. त्या विधवा आणि आदिवासी असल्यानेच त्यांना बोलवण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.