भारतातील कोरोना संकट पाहता संपुर्ण जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत आणि मदतीचा ओघही. पण अशातच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनातील एक महत्वाच्या व्यक्तीने भारतातल्या कोरोना महामारीच्या संकटावर एक भाष्य केले आहे. तब्बल सात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनात मुख्य वैद्यकीय सल्लागार राहिलेल्या डॉ अॅंथनी एस फौची यांनी नुकतेच भारताविषयी केलेले एक भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. डॉ एंथनी फौसी यांनी भारताला सल्ला देतानाच म्हटले आहे की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपुर्ण देशच काही आठवडे का बंद करत नाही असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्याचवेळी ब्रेक द चैनच्या कालावधीत काही दिवस घरीच थांबा आणि एकमेकांची काळजी घ्या असा सल्ला त्यांनी दिला आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ, बेथेस्डा, मेरिलॅंड येथून त्यांनी संवाद साधला आहे.
कोणत्याच देशाला लॉकडाऊन आवडत नाही. पण काही आठवडे सगळ्या गोष्टी, व्यवहार बंद ठेवल्याने कोरोनाचे सातत्याने वाढणारे संक्रमण रोखता येणे शक्य होईल असे ते म्हणाले. जागतिक पातळीवर आरोग्याच्या बाबतीत ज्यांचा सल्ला मानला जातो अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉ अॅंथनी फौची आहेत. या ब्रेक द चैनच्या माध्यमातून कोरोना संक्रमण रोखण्याचा एक आशेचा मार्ग नक्कीच निघेल असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या पावलामुळे देशाच्या यंत्रणेलाही काही तत्काळ, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन अशी पावले घेण्यासाठी वेळ मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कदाचित अशा कठीण आणि मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग यातून नक्कीच निघेल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
भारतात सध्या कठीण परिस्थिती आहे. भारतात सध्या अनेक गोष्टींची नितांत अशी गरज आहे. मी एक सीएनएनचा व्हिडिओ पाहिला त्यामधून अनेक गोष्टी मला निदर्शनास आल्या. त्यामुळेच जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा तुम्हाला शक्यप्राय अशा सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात असेही ते म्हणाले. अनेक गोष्टी नियोजनबद्ध अशा पद्धतीने करण्याची गरज सध्या भारताला आहे. सगळ्याच गोष्टी संकटाच्या गटात टाकून जमणार नाही. अनेक लोक आपले वडिल, आई, भाऊ, बहीण अशा सर्वांना रस्त्यावर ऑक्सिजनच्या शोधात घेऊन वणवण फिरत आहेत असेही माझ्या कानावर आले. यामधून एकच गोष्ट दिसते ती म्हणजे यामध्ये कोणतेही केंद्रीय पातळीवरील असे नियोजन नाही. समन्वयाने या गोष्टी करता आल्या असत्या असेही ते म्हणाले.
भारताला दोन आठवडे महत्वाचे
तातडीने कोणत्या गोष्टी करता येतील यासाठी भारताचे प्राधान्य असायला हवे. येत्या दोन आठवड्यात भारतात काय करू शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करणे ही गोष्ट शक्यप्राय आहे. यामुळे लगेच सगळ संकट संपणार नाही. कारण अनेकांना ऑक्सिजन, बेड, वैद्यकीय सुविधा अशा गोष्टींची गरज आहे. आज तुम्ही लसीकरण कराल तर तत्काळ या संकटावर मात करता येणार नाही. पण यापुढच्या कालावधीत आणखी लोक आजारी पडण्यापासून तुम्ही या उपाययोजनांमुळे नक्कीच अनेक प्राण वाचवू शकता. त्यासाठी भारताला एखादे कमिशन किंवा एमर्जन्सी ग्रुप तयार करावा लागेल. ज्या माध्यमातून देशात वैद्यकीय गोष्टींची पुर्तता आणि पुरवठा सुरळीत होणे शक्य होईल. संयुक्त राष्ट्राशी संलग्न देशही यामध्ये मदत करू शकतील.
आम्ही अमेरिका म्हणून मोठ्या प्रमाणात मेडिकेशन, ऑक्सिजन, पीपीपी किट आणि वेंटीलेटर्सच्या पुरवठ्यासाठी अनेक गोष्टींच्या माध्यमातून भारताला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारताने याआधी अनेक देशांना संकटात मदत केली आहे. त्यामुळे इतर देशांनीही भारताला मदत करण्याची ही योग्य वेळ आहे. सर्व देशांच्या मदतीने भारतातील हे संकट नक्कीच सोडवले जाऊ शकते असेही ते म्हणाले.
चीनने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी काय केले याचीही आठवण त्यांनी करून दिली. तत्काळ नियोजनाचा भाग म्हणून चीनने अवघ्या काही दिवसात त्यांनी एमर्जन्सी युनिट तयार केले. हे युनिट प्रामुख्याने लोकांना हॉस्पिटलच्या रूपात मदत करू लागले. याच गोष्टीकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण नागरिकांना सर्वात तातडीची गरज आहे, ती म्हणजे आरोग्याच्या सुविधा मिळण्याची. सध्या टेलिव्हिजनवर भारतातील चित्र पाहिले तर एकच गोष्ट दिसते ती म्हणजे नागरिक आरोग्याच्या सुविधांसाठी वणवण फिरत आहेत. म्हणूनच एमर्जन्सी युनिटची गरज भारतातही उभे राहण्याची गरज आहे.
लष्कराने देशात लस वितरीत करावी
दुसरी गोष्ट म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणांना एकत्र करणे. त्यामध्ये सैन्याची जबाबदारी काय असेल ? तर सैन्यही नक्कीच या संकटात मदत करू शकते. त्यामध्ये लसीकरणाच्या वितरणासाठी देशात सैन्याची मदत घ्या असेही त्यांनी भारतासाठीचा उपाय सुचवला आहे. त्यानंतर अतिशय गांभीर्याने घेण्याची गोष्ट म्हणजे हॉस्पिटलची उभारणी जितकी तातडीने करता येईल तितक्या वेगाने करणे गरजेचे आहे. जशा प्रकारे एखाद्या युद्धात हॉस्पिटल तयार करण्यात येतात, त्यानुसारच या संकटाशी लढण्यासाठी हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे. सध्या शत्रू हा कोरोना व्हायरस आहे. जेव्हा तुम्हाला तुमचा शत्रू अधिक स्पष्ट असतो तेव्हा तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये अधिक सज्ज होऊन काम करता येते.
चीन, रशियाच्या मदतीने भारताने वॅक्सिन बास्केट तयार करावे
येत्या दोन आठवड्यात तातडीने करण्यात येणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण असायला हवी. इतक्या मोठ्या भारत देशात अवघे दोन टक्का लोकसंख्या लस घेते ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळेच अधिकाधिक लोकांना लस देण्याची गरज सध्याच्या घडीला भारताला आहे. भारतात सध्या २ टक्के लोकांना लस मिळाली आहे. तर ११ टक्के लोकांना लसीचा एक डोस मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे लसीकरण होणे गरजेचे आहे. म्हणूनच नागरिकांची सुरक्षा करायची असेल तर अधिकाधिक लोकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठीच अधिकाधिक कंपन्यांसोबत करार करण्याची गरज आहे. भारत हा सर्वाधिक लस तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक देश आहे. म्हणूनच चीन आणि रशिया यासारख्या देशांसोबत करार करून भारताने वॅक्सिन बास्केट उभारण्याची गरज आहे.