बिहारच्या भागलपूरमधील एका तीन मजली इमारतीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर 8 जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. या जखमींवर भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या इमारतील गावटी बॉम्ब बनवले जात असल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या जमीनदोस्त इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम युद्धा पातळीवर सुरु आहे. दरम्यान ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भागलपूर जिल्ह्यातील तातारपूर पोलीस स्टेशन परिसरात हा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 2 ते 3 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत कोतवालीपासून केवळ 100 मीटर अंतरावर होती. गावटी बॉम्बच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटात तीन मजली इमारत पूर्णपणे कोसळली आहे.
इमारतीत सुरु होते बेकायदेशीर फटाके आणि बॉम्ब बनवण्याचा गोरखधंदा
भागलपूरचे डीआयजी सुजित कुमार म्हणाले की, “प्राथमिक तपासात बारूद, बेकायदेशीर फटाके आणि गावटी बनावटीच्या बॉम्बच्या स्फोटामुळे ही भीषण दुर्घटना घडली आहे. एफएसएल टीमच्या तपासानंतर हा स्फोट कशामुळे झाला हे ठरवले जाईल. जखमींवर भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.
भागलपूरच्या माजी उपमहापौर प्रति शेखर म्हणाल्या की, भागलपूरमध्ये गावटी बॉम्ब स्फोटाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.
हा स्फोट इतका भीषण होता की, तो अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला, तर काहींना याचे सौम्य हादरे जाणवले. सुरुवातीला सिलिंडर फुटल्याचा आवाज आल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे होते, मात्र काही वेळाने परिस्थिती स्पष्ट झाली. या स्फोटात 2-3 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या घरात बारूदी बनवण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. फटाक्यांच्या नावाखाली याठिकाणी अवैध गावटी बॉम्बचा धंदा सुरू होता. मात्र पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.