गया –
बिहारच्या गया जिल्ह्यातील मानपुर स्थानकाजवळ सोमवारी रात्री उशीरा राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक झाली. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले. सियालदह ते नवी दिल्ली जाणाऱ्या एक्सप्रेसवर झालेल्या दगडफेकीत रेल्वे बोगीतील खिडक्यांच्या काचा फुटल्या. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला, लोकं सैरभैर झाले. या गोंधळामुळे अनेक प्रवाशांनी आपली पुढील यात्रा रद्द केली. रेल्वेच्या डागडुजीनंतर तासाभरात म्हणजे रात्री ११.५० मि. राजधानी पुन्हा दिल्लीकडे रवाना झाली.
का झाली दगडफेक ?
सियालदह ते नवी दिल्ली या एक्सप्रेसच्या आधीची गया ते हावडा जाणारी रेल्वे मानपुर स्थानकावर एक तास थांबवून ठेवण्यात आली होती. सायंकाळी ७ च्या दरम्यान पुलिया निर्माण येथील क्रेनला तडा गेल्याने ट्रॅक प्रभावित झाला होता. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी मानपुर स्थानकावर दगडफेक केली. आरपीएफच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. ट्रॅक मोकळा झाल्यानंतर रात्री १२ वाजता ही गाडी रवाना झाली. या दरम्यान राजधानी एक्सप्रेस साधारण १०.३५ वाजता येथील मार्गावरून जाताना संतप्त प्रवाशांनी राजधानीवरही दगडफेक केली. आरपीएफ अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.
राजधानीची दुरावस्था
प्रवाशांच्या मते दगडफेकीत एक्सप्रेसमधील सर्वच बोगींतील खिडक्यांच्या काचा फुटल्या. यामुळे राजधानीचे इंजिनही प्रभावित झाले. बी – ३ बोगीमध्ये प्रवास करणाऱ्या रवीशेखर, नेहा गुप्ता आणि शोभा गुप्ता कुटुंबियांसह दिल्लीला जात असताना या दगडफेकीत ते जखमी झाले. त्यांनी आपला पुढील प्रवास रद्द केला.