मुंबई : मराठ्यांना सत्तेत घ्यायचे नाही, त्यांना आरक्षण न देता केवळ झुलवत ठेवायचे हा निजामी मराठ्यांचा डाव आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच केला होता. त्यापाठोपाठ सार्वजनिक क्षेत्रातील आरक्षण संपवण्याचा अजेंडा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) असल्याचा दावा त्यांनी आता केला आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची टीका म्हणाले; “शरद पवार भाजपचे…”
प्रकाश आंबेडकर यांनी चारच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला होता. भाजपा-आरएसएसची वृत्ती धार्मिक ध्रुवीकरणाची, दंगे आणि दहशत निर्माण करण्याची राहिली आहे. त्यासाठी कधी दलित, मुस्लीम, आदिवासींचा वापर त्यांनी केला आहे. नऊ वर्षांत कोणतेच विकासाचे राजकारण दिसत नाही. त्यामुळे भाजपाकडून पुन्हा धर्मिक लढाई खेळली जाईल, असा आरोप करत हिंदू अस्मितेशी संबधित असलेल्या मंदिरावर हल्लाही होऊ शकतो, अशी भीतीही आंबेडकर यांनी व्यक्त केली होती.
भाजप-आरएसएसचं धोरण म्हणजे SC, ST आणि OBC यांचे सार्वजनिक क्षेत्रातील – शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण दुर्बल करणे आणि संपवणे होय .
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप महाराष्ट्र सरकारचा, सरकारी आस्थापनामध्ये विविध पदांसाठी कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 18, 2023
त्यापाठोपाठ आज, सोमवारी त्यांनी पुन्हा ट्वीट करत भाजपा आणि आरएसएसवर टीका केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील, विशेषत: शिक्षण आणि नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती-जमाती तसेच अन्य मागसवर्गीयांचे आरक्षण क्षीण करत ते बंद करण्याचा अजेंडा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनांचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा – Parliament Special Session : प्रबळ विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न; सरकारवर आरोप
सरकारी आस्थापनांमधील विविध पदांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी 9 खासगी एजन्सी नेमण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा सरकारने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे, सरकारी क्षेत्रातील एससी, एसटी आणि ओबीसीसाठी असलेले आरक्षण संपवण्याच्या अनेक पावलांपैकी एक आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
भाजपा-आरएसएसची आरक्षणविरोधी भूमिका असून भारतातील दलित, आदिवासी आणि ओबीसींनी शिक्षित व्हावे, सामाजिक आर्थिक उन्नती साधावी आणि सवर्णांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावे, असे त्यांना वाटत नाही, असे सांगत, त्यांचे हे धोरण पूर्णपणे जातीयवादी असून आरक्षण दुर्बळ करून ते समाप्त करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
The Congress uses India’s Dalits, Adivasis, Muslims and OBCs like a tissue paper.
Use and throw! pic.twitter.com/l1KhNTS2Qh
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 18, 2023
तर, काँग्रेसवरही प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली. दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसींचा वापर काँग्रेसकडून टिश्यूपेपर सारखा केला जातो. यांचा वापर केला जातो आणि नंतर त्यांना फेकून दिले जाते, अशी टीका त्यांनी केली.