भाजप नेते तेजिंदर बग्गा यांना यांच्यावर पंजाब पोलिसांकडून मोठी करावाई करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी आज बग्गा यांना अटक केली आहे. पंजाब पोलिसांच्या या कारवाईवर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी कपिल मिश्रा यांनी ट्विट केले की, तेजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या ५० कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांना त्यांच्या घरातून नेले आहे. बग्गा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यांच्या ट्विटवरून वादही निर्माण होतात. मात्र, बग्गा यांना अटक केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
तेजिंदर बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्विट केले होते. बग्गा यांच्या ट्वीटमुळे समाजात तेढ निर्माण होण्याचा आरोप करत मोहालीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजिंदर बग्गा यांना अटक केल्यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकार आणि आम आदमी पार्टीवर टीका केली आहे. बग्गा यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पंजाब पोलिसांचे ५० जवान दाखल झाले होते, असा दावा कपिल मिश्रा यांनी केला. बग्गा अशा कारवाईमुळे घाबरणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाकडून पंजाबमध्ये मिळालेल्या सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. पंजाबमधील सत्तेचा वापर आता विरोधकांना धमकावण्यासाठी सुरू केला असल्याचे दिल्लीतील भाजप प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी सांगितले आहे. आम्ही तेजिंदर बग्गा यांच्या पाठिशी असल्याचे कपूर यांनी म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या मुद्द्यावरून टीका केली होती. त्यानंतर बग्गा यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिका केली होती. बग्गा यांनी याआधीदेखील अनेकदा वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पंजाबचा कायदा व सुव्यवस्था सोडून दिल्लीतील लोकांना अटक करण्यासाठी पंजाबचे पोलीस तैनात करण्यात आल्याचे दिसत आहे.
काँग्रेसने बग्गा यांची अटक चुकीची असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल आपल्या अजेंड्यासाठी पंजाब पोलिसांचा गैरवापर करत आहेत. बग्गांना अटक ज्या पद्धतीने अटक करण्यात आली त्यावर त्यांनी आक्षेप घेतला.