पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपामधील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापुढे जनता दल यूनायटेडशी कधीही युती न करण्याचा निर्णय बिहार भाजपाच्या कार्यकारिणीने घेतला आहे. तर, यावर प्रतिक्रिया देताना जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, मरेन पण भाजपाबरोबर कधीही जाणार नाही.
आपला पक्ष फोडण्याचा तसेच आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून पक्षाचे नुकसान करण्याचा प्रयत्न भाजपा करीत असल्याचा आरोप करत नितीश कुमार यांनी ऑगस्ट 2022मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजद आणि काँग्रेसच्या पाठबळावर त्यांनी राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपा आक्रमक झाले आहे. दुसरीकडे, नितीश कुमार यांनी विरोधकांची मोट बांधण्याच्या दृष्टीने विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
The youth must never forget this day (Mahatma Gandhi’s death anniversary). If they (BJP) attempt to make people forget this day or ignite fights, that’s a different thing. I prefer death than going with them (BJP). They even made cases on his (Tejashwi Yadav’s) father: Bihar CM pic.twitter.com/iiviKQNxZP
— ANI (@ANI) January 30, 2023
या पार्श्वभूमीवर, बिहार भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. यादरम्यान भाजपाचे राज्यसभा सदस्य सुशील मोदी यांनी माध्यमांशी बोलताना नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी नितीश कुमार यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात नितीशकुमार यांच्याशी कधीही युती होणार नाही, असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले.
नितीश कुमार यांनी केवळ भाजपाचीच फसवणूक केली नाही, तर बिहारच्या जनतेचीही फसवणूक केली आहे. नितीशकुमार आता ओझे बनले आहेत. जे बलवान असतात, त्याच्याशी तडजोड केली जाते. नितीशकुमार यांची मते खेचून आणण्याची क्षमता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जदयूच्या बाजूने भाषण केल्यानंतर जदयूला 44 जागा जिंकता आल्या, असे मोदी म्हणाले.
महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री नितीश कुमार हे पाटण्यातील गांधी घाटावर गेले होते. तिथे त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मरणे मान्य आहे, पण भाजपासोबत जाणे मान्य नाही. त्यांचे सर्व काही बोगस आहे. एवढ्या मेहनतीने आणि हिमतीने आम्ही त्यांना सोबत घेतले होते. काय केले नाही, लालूंवर केस दाखल केली होती. आता पुन्हा युती संपवून आम्ही वेगळे झालो आहोत, तर पुन्हा काहीतरी करण्याच्या विचारात ते आहेत. सगळ्यांना इकडून तिकडे कसे करायचे, याच प्रयत्नात ते आहेत, अशी टीका त्यांनी केली.