पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्जा याने भारतात अनेक वेळा आल्याचा दावा केला असून या भारत भेटीत त्याला मिळालेली गोपनीय माहिती त्याने वेळोवेळी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दिल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्यानंतर भाजपने तत्कालिन उपराष्ट्रपती असलेल्या हामिद अन्सारी आणि काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. याचपार्श्वभूमीवर, भाजप प्रवक्ते गौरव भाटीया यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्यावर हल्लाबोल केला . काँग्रेस ‘ISI एजंटकडून दहशतवादा विरोधात लढायचे ट्रेनिंग घेत होते का असा टोला त्यांनी हाणला आहे.
पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्जा याने एका पाकिस्तानी वृत्तवाहीनीला मुलाखत दिली .त्यावेळी त्याने काँग्रेसच्या सत्तेत आणि हामिद अन्सारी यांच्या कार्यकाळात अनेकवेळा भारतात गेल्याचं आणि त्यादरम्यान गोपनीय माहिती हाती लागल्याचं सांगितलं. तसेच ती माहिती आयएसआयला दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यानंतर भाजपने हामिद अन्सारी यांना लक्ष्य केलं आहे. मात्र हामिद अन्सारी यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळले असून सरकारी नियमांनुसार परदेशातील महत्वाच्या व्यक्तींना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. असा दावा केला आहे. यावर गौरव भाटीया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी संविधानाने दिलेल्या महत्वाच्या पदावरील व्यक्तीवर फार मोठी जबाबदारी असते. पण त्या व्यक्तीपेक्षा देश मोठा असून नागरिकांचे हित देखील मोठे असते. पण असे असताना हामिद अन्सारी यांनी मात्र याप्रकरणाचे सगळे खापरच काँग्रेस सरकारवर फोडले असून उप राष्ट्रपती कार्यक्रमात सरकारी सल्ल्यानंतर महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रित केले जाते. यामुळे मिर्जा यांना भारतात वारंवार बोलावण्याशी आपला काहीही संबंध नाही असे सांगितल्याचे भाटीया म्हणाले.
तसेच यावेळी भाटीया यांनी पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवला असून तो फोटो दहशवादावरील परिषदेचा आहे. त्यात व्यासपीठावर हामिद अन्सारी आणि पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्जाही बसलेले आहेत. यावर भाटीया यांनी प्रश्नचिन्ह उभारले . अशा प्रकारच्या कार्यक्रमांची माहिती गुप्तचर यंत्रणांना नंतर दिली जाते का असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच संविधानाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीचा जर कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाबदद्ल माहिती जाणून घेण्याचा अधिकार प्रोटोकोलनुसार संबंधित व्यक्तीला असतो. मग असे असताना दहशतवादावरील कार्यक्रमात पाकिस्तानची एक व्यक्ती कार्यक्रमात येते आणि भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण करू शकते हे काँग्रेसला कळाले नाही का किंवा हामिद अन्सारी यांनी त्याला कार्यक्रमास बोलवू नका असे का नाही सांगितले. असा सवालही भाटीया यांनी यावेळी केला. काँग्रेस ‘ISI एजंटकडून दहशतवादा विरोधात लढायचे ट्रेनिंग घेत होते का असेही ते म्हणाले.