नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आणि संपूर्ण देशात एकदम उत्साह संचारला. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी आता राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. कोणत्या राज्यात कुठला पक्ष सोबत येईल, कोणासोबत आपल्याला जाता येईल, याची चाचपणी सुरू झाली आहे. आघाडी आणि जागावाटपांवर सध्या चर्चा सुरू झाली आहे. सत्तेत असलेला आणि देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाची देखील वेगवेगळ्या राज्यात स्थानिक पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी चर्चा सत्कारणी लागते आहे तर काही ठिकाणी या चर्चा फिस्कटताना दिसत आहेत. ओडिशात असेच काहीसे घडले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत भाजपाची बोलणी फिस्कटली आहेत. त्यामुळे आता भाजपा येथे स्वबळावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे.
हेही वाचा – Ravindra Dhangekar : धंगेकरांच्या पोस्टरवर फोटो गिरीश बापटांचा, मुलाने व्यक्त केल्या भावना
अनेक दिवसांपासून भाजपा आणि बीजू जनता दल यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू होती. दोन्ही पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढतील असं सांगितलं जात होतं. मात्र काही गोष्टींवर बिनसलं आणि भाजपाने ओडिशात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) येथे पोस्ट करत ही घोषणा केली आहे.
पोस्टमध्ये काय?
10 वर्षापासून नवीन पटनायक यांच्या नेतृत्वात ओडिशात बीजू जनता दल मोदी सरकारच्या अनेक राष्ट्रीय योजनांना समर्थन आणि सहकार्य देत आली आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. परंतु केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे ओडिशातील जनता योजनांपासून वंचित राहिली असं त्यांनी सांगितले. ओडिशा अस्मिता, गौरव आणि ओडिशातील लोकांच्या हितासाठी आम्ही काम करतोय. ओडिशाच्या विकासासाठी भाजपा यंदा लोकसभेच्या 21 जागा आणि विधानसभेच्या 147 जागांवर स्वबळाने निवडणूक लढणार आहे, असं शामल यानिपोस्टमध्ये म्हटलं आहे. ओडिशातील जागावाटपात भाजपाला सर्वाधिक जागा हव्या होत्या त्यामुळे दोन्ही पक्षातील बोलणी अयशस्वी ठरली. त्यामुळे आता हे पक्ष एकट्याने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
विगत 10 वर्षों से, श्री नवीन पटनायक जी के नेतृत्व में ओडिशा की बीजू जनता दल (बीजेडी) पार्टी केंद्र की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की सरकार के अनेक राष्ट्रीय महत्व के प्रसंगों में समर्थन देती आई है, इसके लिए हम उनका आभार व्यक्त करते हैं।
अनुभव में आया है कि देशभर…
— Manmohan Samal (Modi Ka Parivar) (@SamalManmohan7) March 22, 2024
यापूर्वीचा इतिहास काय?
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात 44.8 टक्के मते घेत 21 जागांपैकी 20 जागांवर यश मिळवले होते. तर बीजू जनता दलाने 1 जागेवर विजय मिळवला होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपाने 8 तर बीजू जनता दलाने 8 जागांवर विजय मिळवला. तर विधानसभा निवडणुकीत बीजू जनता दलाने 112 आणि भाजपाने 23 जागांवर विजय मिळवला होता.
हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवार माढ्यातून जानकरांना उमेदवारी देणार? 9 जणांची संभाव्य यादी समोर