कोरोना महामारीच्या लढाईत कोरोना प्रतिबंधात्मक लस एक महत्त्वाचे अस्त्र आहे. त्यामुळे संपूर्ण जगात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. सध्या भारतात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत देशात ५६ कोटींहून अधिक लसीकरण पार पडले आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया पार पडते. पण आता तिसरा बुस्टर डोस घेण्याची गरज भासू शकते. कारण अनेक कंपन्या याबाबत शिफारसी करत आहेत. काही दिवसांपूर्वी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही तिसरा बुस्टर डोस गरजेचा असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक सायरस पुनावाला म्हणाले होते. आता आयसीएमआर आणि एनआयव्ही (ICMR- NIV) संचालिका प्रिया अब्राहम यांनी बुस्टर डोसबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाल्या प्रिया अब्राहम?
‘भविष्यात बुस्टर डोसबाबत निश्चितच शिफारसी येतील. त्यामुळे बुस्टर डोस देण्याची गरज भासू शकते. सध्या बुस्टर डोसचा अभ्यास केल्या जात असून भारतात बाहेर बुस्टर डोस दिला जात आहे. सात विविध लस कंपन्या बुस्टर डोससाठी प्रयत्न करत आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जास्तीत जास्त देशांमध्ये लसीकरण पूर्ण होईपर्यंत बुस्टर डोसला स्थगिती दिली आहे,’ असं प्रिया अब्राहम म्हणल्या.
यापूर्वी सायरस पुनावाला म्हणाले होते की, ‘कोविड प्रतिबंधक लसीचे केवळ दोन डोस पुरेसे नसून तिसरा डोसही गरजेचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास कदाचित बुस्टर डोसनंतर पुन्हा लस घ्यायला लागू शकते. मी स्वतः बुस्टर डोस घेतला आहे.’
हेही वाचा – Live Update: मुंबईतील लसीकरण आज आणि उद्या बंद