उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये भिंत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 4 मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी ढिगाऱ्याखाली दबलेल्या 12 मजूरांना वाचवण्यात यश आले आहे. नोएडाच्या सेक्टर 11 मध्ये जलवायू विहार सोसायटीमध्ये ही बांधकामाधीन भिंत कोसळली आहे. दरम्यान जेसीबीच्या साहाय्याने बराचसा ढिगारा हटवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी मजुरांची एक टीम नाले सफाईचे काम करत होते. याचवेळी अचानक भिंत कामगारांच्या अंगावर पडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर काही वेळातच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर प्रशासनासह स्थानिक नागरिकही बचावकार्यात मदत केली. मात्र काही वेळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीची भिंत खूप जुनी होती. यावेळी अचानक ती भिंत कामगारांवर पडली. सध्या जेसीबीच्या साह्याने ढिगारा हटवण्यात आला आहे.
अपघाताबाबत डीएम सुहास एलवाय म्हणाले की, या ठिकाणी नाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. नोएडा प्राधिकरणाने यासाठी कंत्राट दिले होते. कामगार काम करत होते. यावेळी भिंतीवरून वीट काढत असताना हा अपघात झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. या अपघाताबाबत नोएडा प्राधिकरणाच्या सीईओ रितू माहेश्वरी म्हणाल्या की, कोणीही दबले गेल्याची कोणतीही माहिती नाही. हा अपघात का झाला, याचा तपास केला जाईल.
या अपघातावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विटही आले आहे. भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याचे आणि जखमींवर योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.