नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्तावाला आज नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधकांनी सभात्याग केला. त्यात मोदींच्या नेतृत्वातील एनडीएचा विजय झाला. मात्र त्याचवेळी मोदींना सभागृहात मणिपूर हिंसाचारावर बोलायला भाग पाडल्याने हा विजय कुणाचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सर्व विरोधीपक्ष करत होते. शिवाय मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही, असा सवालही विरोधक करत होते. यावर बुधवारी अमित शहा यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र मणिपूर मुद्दावर मोदींनी बोलावे, असा आग्रह विरोधकांकडून सुरू होता. यावर आज मोदींनी लोकसभेत भूमिका स्पष्ट केली.
लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सलग तीन दिवसांच्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी उत्तर दिले. 2 तास 12 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरच्या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलं होतं. देशाला विश्वास हवा, असे ते म्हणाले. दरम्यान पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला.
पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव मंजूर झाला. यानंतर संसदेचे कामकाज सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. शुक्रवारी लोकसभेत मणिपूरवर चर्चा होणार आहे. यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाईल. कारण शुक्रवार 11 ऑगस्ट हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.
पुन्हा एकदा बहुमत सिद्ध झाले
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बहुमतासाठी सभागृहात 50 टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य उपस्थित असले पाहिजेत. लोकसभेत भाजपचे 303 सदस्य आहेत. मित्रपक्षांसह हा आकडा 333 वर जातो. वायएसआर, बीजेडी आणि टीडीपीनेही पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसचे 51 सदस्य आहेत. इंडिया आघाडीसह, खासदारांची संख्या 143 आहे. मात्र, अविश्वास ठरावासाठी इव्हीएम मशीन किंवा कागदी मतदानाची गरज नव्हती. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव मंजूर झाला. मोदी सरकार सभागृहात जिंकले. मोदी सरकारकडे संसदेत बहुमत असल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा : Loksabha : भाजीपाला हिंदू अन् बकरा मुस्लिम; मणिपूरप्रकरणी महुआ मोईत्रांची मोदी सरकारवर बोचरी टीका
संसदेत आतापर्यंत 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला
मोदी सरकारविरोधात आतापर्यंत दोनदा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे. देशाच्या संसदेत आतापर्यंत 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. चीन युद्धानंतर 1963 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नेहरू सरकारविरोधात पहिला ठराव आणण्यात आला होता.