मुंबई : राजधानी दिल्लीतील हिंदुस्थानचे संसद भवन दिमाखात उभे आहे. आणखी किमान शंभर वर्षे त्या भव्य वास्तूस साधा तडाही गेला नसता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात आले म्हणून त्यांनी दिमाखदार ऐतिहासिक ‘संसद भवना’ला टाळे लावले आणि त्याच आवारात नवे संसद भवन उभे केले. जुने संसद भवन व्यवस्थित आहे. तरीही समोर एक ‘सवत’ दिमाखात उभी करून त्यावर सरकारी तिजोरीतून 20 हजार कोटी रुपये उधळले. हा सर्व अट्टहास कशासाठी? अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा – पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर झळकले
दैनिक सामनातील आपल्या रोखठोक सदरात खासदार संजय राऊत यांनी नव्या संसद भवनाच्या उभारणीवरून मोदी सरकावर शरसंधान केले आहे. राजधानी दिल्लीतील हिंदुस्थानचे संसद भवन दिमाखात उभे आहे. आणखी किमान शंभर वर्षे त्या भव्य वास्तूस साधा तडाही गेला नसता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात आले म्हणून त्यांनी दिमाखदार ऐतिहासिक ‘संसद भवना’ला टाळे लावले व त्याच आवारात नवे संसद भवन उभे केले, असे त्यांनी या म्हटले आहे.
20 सप्टेंबरला विशेष अधिवेशनासाठी मी नव्या संसद भवनात पोहोचलो तेव्हा बाहेर व आत एकंदरीत गोंधळाचेच चित्र होते. जुन्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी लोकसभा तसेच राज्यसभेसाठी स्वतंत्र भव्य दरवाजे होते. लोकसभेसाठी इतर ‘दोन’ दरवाजे पंतप्रधान व उपराष्ट्रपतींना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. त्यामुळे अधिवेशन काळात कधीच अव्यवस्था दिसली नाही. नव्या संसद भवनात लोकसभा व राज्यसभेसाठी एकच ‘दार’. त्यामुळे सुरुवातीपासून गोंधळास सुरुवात होते. दिल्लीत सध्या घामाच्या धारा वाहत आहेत असा उन्हाळा आहे. त्या उन्हात खासदार व कर्मचारी आत शिरण्यासाठी उभे आहेत. लोकसभेला आधी होते तसे दिमाखदार पोर्च येथे नाही, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – मुंबई महापालिकेचे भूखंड, उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; जयंत पाटलांची मागणी
आधीच्या संसद भवनाची इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता हे खरे आहे, पण या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा घाम, मेहनत आणि पैसाही आपल्या देशाने गुंतवला,” असे पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या निरोपाच्या भाषणात सांगितले. संसद भवन ही प्रेरणादायी व तजेलदार वास्तू असते. अशा इमारती वृद्ध व जर्जर होत नाहीत. त्यांना बाद करणे भारतमातेस ‘वृद्ध’ झाल्याचे सांगत वृद्धाश्रमात ढकलण्यासारखे आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.