मोदी कॅबिनेटने चालू खरीप विपणन हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. विविध पिकांच्या किंमतीत ५० टक्के ते ६२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यानंतर आर्थिक प्रकरणांच्या मंत्रिमंडळ समितीने २०२१-२२ या पीक वर्षासाठी हा निर्णय घेतला. ‘केंद्र सरकारने खरीप पिकांच्या MSP मध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार गेली सात वर्षे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच तयार आहे,’ असे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.
खरीप विपणन हंगाम 2021-22 साठीच्या किमान हमी भावाला #Cabinet ची मंजुरी
गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान हमी भावातील सर्वाधिक वाढ तीळाला (452 रुपये प्रति क्विंटल) देण्याची शिफारस
त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला (प्रत्येकी 300 रुपये प्रति क्विंटल) देण्याची शिफारस –@nstomar
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) June 9, 2021
नव्या MSP नुसार, तीळासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक किंमत निश्चित करण्यात आली आहे, जी ४५२ रुपये प्रतिक्विंटल इतकी आहे. त्याखालोखाल तूर आणि उडीदसाठी ३०० रुपये प्रतिक्विंटल इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे. तर भातपिकासाठी ७२ रुपये ते १,९४० रुपये प्रति क्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. गेल्यावर्षी भातासाठीची किमान आधारभूत किंमत ही १,८६८ इतकी होती.
भूईमूगासाठी २७५ रुपये आणि तेल बियांसाठी २३५ रुपये प्रतिक्विंटल MSP निश्चित करण्यात आला आहे. विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या खरीप पिकांसाठी विविध MSP निश्चित करण्यात आल्याचे नरेंद्र सिंह तोमर यांनी नमूद केले.